
Karad, 05 July : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्यास मला नवल वाटणार नाही, असे विधान खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले होते. मात्र, त्यानंतर वर्धापनदिनानंतर ती चर्चा थंडावली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मात्र, दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील ओलावा अद्याप कायम आहे. त्याचाच प्रत्यय साताऱ्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजितदादा यांच्यात तब्बल अर्धा तास गुफ्तगू झाले, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाची सुरुवात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या भूमितून होण्याचे संकेत आहेत का, अशी चर्चा रंगली आहे.
माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव जशराज यांच्या विवाहासाठी यशवंतनगर (कराड) येथे दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आदी उपस्थित होते.
लग्नासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे आवर्जुन उपस्थित हाेते. त्यांच्यासोबत माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे व इतर मान्यवर होते. पवारांच्या यापूर्वीच्या बहुतांश सातारा दौऱ्यावेळी जयंत पाटील (Jayant Patil) हे शरद पवार यांच्यासोबत सातारा दौऱ्यात सहभागी असायचे. या वेळी मात्र शरद पवार यांच्यानंतर जयंत पाटील हे लग्नस्थळी दाखल आले होते. ते लग्नाच्या ठिकाणी काही वेळ थांबून होते. अजित पवार यांना भेटूनच जयंत पाटील हे लग्नाच्या मंडपातून बाहेर पडला.
वधू-वरांना शुभेच्छा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे चहापानासाठी व्हीआयपी कक्षात थांबले होते. त्या ठिकाणी जयंत पाटील आले. अजितदादांनी जयंत पाटील यांना जवळ बोलावून घेत त्यांची चर्चा सुरू केली. दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चाय पे चर्चा रंगली होती. दोघांनी त्याच ठिकाणी मिळून अल्पोपहार आणि चहा घेतला. दोघांमध्ये गंभीरपणे चर्चा सुरू होती. त्याठिकाणी मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, बाळासाहेब सोळसकर उपस्थित होते.
दोघांमधील चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबाबत चर्चा झाली आहे का? जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार अशा बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात तब्बल अर्धा तास तीही गंभीरपणे चर्चा होणे महत्वाचे मानले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना या दोन नेत्यांमध्ये जमत नव्हते. दोघेही एकमेकांना शह कटशह देण्याचे राजकारण खेळत होते. महायुतीमध्ये अजूनही एक मंत्रिपद रिक्त आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीतही जयंत पाटील यांची एन्ट्री होऊ शकते, अशी चर्चा रंगली आहे. पण, दोघांमध्ये सद्यस्थितीतील राजकीय घडामोडींवर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दोघांच्या भेटीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.