
Sangli News : सांगली जिल्ह्यासह अख्ख्या राज्याच्या डोकेदुखीचे कारण येथील विटा एमडी ड्रग्ज प्रकरण ठरले आहे. या प्रकरणात एलसीबीने मोठी कारवाई करत माऊली इंडस्ट्रिजच्या मालकीणीस अटक केली आहे. तर आता जिल्ह्यातील शाळांच्या जवळ असणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले असून येत्या काहीच दिवसात याचा अहवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील अवैध्य पानटपऱ्यांधारकांचे धाबे दणानले आहेत.
खिळे, तारा तयार करणाऱ्या जागेत एम.डी. ड्रग्जच्या निर्मितीचा भांडाफोड काहीच दिवसांपूर्वी झाला होता. यानंतर माऊली इंडस्ट्रिजबाबत काही प्रश्न निर्माण झाले होते. यानंतर पालकमंत्री पाटील यांनी कारवाई अधिक कडक करावी, असे आदेश दिले होते. यानंतर आता भाडेकरार करताना औद्योगिक विकास महामंडळासह इतर संस्थांकडून कोणतेही आवश्यक परवाने घेतले नसल्याचे उघड झाले आहे. यामुळे कार्वे (ता. खानापूर) येथील औद्योगिक वसाहतीमधील माऊली इंडस्ट्रिजच्या मालकीण गोकुळा विठ्ठल पाटील (वय ४७, रा. पाटीलवस्ती, विटा) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिलीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्वे औद्योगिक वसाहतीतील माऊली इंडस्ट्रिज हा कारखाना गोकुळा पाटील यांच्या मालकीचा आहे. या कारखान्याची जागा 2020 मध्ये एका व्यक्तीने गोकुळा पाटील यांना सर्व परवानग्या घेऊन हस्तांतरित केला होता. या जागेत तार, खिळे तयार करण्याच्या कारखान्याची परवानगी पाटील यांना औद्योगिक महामंडळाने दिली होती. मात्र, कारखाना बंद असल्याबाबत दीड वर्षापूर्वींच महामंडळाने त्यांना नोटीस बजावली होती.
दरम्यान एमडी ड्रग्ज प्रकरणातील संशयित राहुदीप बोरिचा, बलराज कातारी यांनी गोकुळा पाटील यांच्याकडून अत्तर तयार करण्यासाठी हे शेड भाड्याने मागितले होते. पण कोणतीही शहानिशा न करता बलराज कातारी याला हे शेड करारपत्र करून गोकुळा पाटील दिले. त्यातही जो करारपत्र झाला तो अधिकृत झाला नाही. याबाबत औद्योगिक विकास महामंडळाला देखील माहिती देण्यात आली नाही. कारखान्यात अत्तर उत्पादन करणार असल्याचे सांगितले असले तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाला देखील याची माहिती देण्यात आली नसल्याचे आता समोर आले आहे.
गोकुळा पाटील फक्त पैसे मिळतात म्हणून खातरजमा न करारपत्रक केला. धक्कादायक म्हणजे करारपत्रक अधिकृत न करता फक्त पाचशे रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर करण्यात आला आहे. त्यावर देखील साक्षीदारांच्या सह्या नाही.
एमडी ड्रग्ज प्रकरणावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून पोलिसांच्या कामावरच आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच हा मुद्दा जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत गरम झाल्याने शाळा, महाविद्यालयांच्या कुंपन भिंतीला लागून असलेल्या पान टपऱ्यांचा मुद्दा देखील चर्चेला आला. यामुळे आता अशा पानटपऱ्यांवर हातोडा चालवला जाणार आहे.
शाळा, महाविद्यालयांच्या कुंपन भिंतीला लागून असलेल्या पान टपऱ्यांची माहिती घेण्याचे काम अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने सुरू केले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढच्या आढावा बैठकीत याबाबत माहिती घेणार आहेत. यानंतरच अशा टपऱ्यांची उचलबांगडी केली जाणार असून स्थानिक राजकारण्यांना हाताशी धरून शाळा परिसरात मावा, गुटखा, गांजाचे अड्ड्यांवर आता हातोडा चालणार आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील अमली पदार्थांची साखळी मोडून काढण्यासाठी गंभीर दखल घेतली आहे. त्यासाठी त्यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक आणि औषध प्रशासन सहायक आयुक्त यांची टास्क फोर्स बनविण्यात आली आहे. नियोजन समितीच्या बैठकीत नशाबाजार रोखला पाहिजे मागणी जिल्ह्यातील आमदारांनी केली होती. तसेच खाऊच्या पानातून पावडर स्वरूपात अमली पदार्थ विकले जात असून काही ठिकाणी नशेच्या गोळ्या विकल्या जात असल्याचीही तक्रार करण्यात आल्या होत्या. तर अनेकदा मुलींची छेडछाड होत असल्याचे प्रकारही घडत असल्याचे सांगण्यात आले होते. या साऱ्या गोष्टींना दणका देण्यासाठी पान टपऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.