
Solapur, 11 July : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाराजी माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून पुन्हा एकदा भेटीचा निरोप आला आहे. येत्या 14 जुलै रोजी साठे यांना मुंबईत भेटीसाठी पवार यांनी बोलावले आहे. याबाबतची माहिती खुद्द बळीराम साठे यांनी दिली आहे. तसेच, मनासारखा निर्णय न झाल्यास आपल्याला मार्ग मोकळा आहे, असा सूचक इशाराही साठे यांनी दिला आहे, त्यामुळे येत्या 14 तारखेच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बळीराम साठे (Baliram Sathe) यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून हटवून त्यांच्या जागी मोहिते पाटील समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्याला जिल्हाध्यक्षपदारून मानहानीकारक पद्धतीने हटविण्यात आल्याचे सांगून साठे यांनी पक्षात बंडाचा झेंडा उभारला होता.
संजय पाटील घाटणेकरांच्या भेटीनंतर शरद पवारांनी बळीराम साठे यांना भेटीस बोलावले होते. पवारांच्या निरोपानुसार साठे हे बारामतीत गोविंद बागेत भेटायला गेले होते. त्या वेळी शरद पवारांनी (Sharad Pawar) साठे हे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत असतील. त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद कायम राहील, असे सांगून दोन जिल्हाध्यक्ष नेमण्याबाबत सूतोवाच केले होते.
सोलापूर (Solapur) लोकसभा मतदारसंघात येणारे तालुक्याचे कार्यक्षेत्र बळीराम साठे यांच्याकडे देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. तसेच साठे हे मला सोडून कोठेही जाणार नाहीत, असे म्हटले होते. साठे यांना जिल्हाध्यक्षपदाचा शब्द देऊन सोळा दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र, पक्षाच्या पातळीवरून अजूनही साठे यांच्या जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय जाहीर झालेला नाही.
खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शब्द देऊन 16 दिवसांचा कालावधी लोटला तरी काका यांच्या जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय होत नसल्याने साठे समर्थकांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. ती अस्वस्थता पुन्हा एकदा पवारांपर्यंत पोहोचविण्यात आल्याची माहिती आहे, त्यानंतर पवारांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष साठे यांना भेटीसाठी मुंबईला बोलावले आहे.
बळीराम साठे यांना भेटीसाठी येत्या सोमवारची (ता. 14 जुलै) वेळ देण्यात आली आहे. मुंबईत ही भेट होणार आहे, असे बळीराम काका साठे यांनी स्पष्ट केले. भेटीला जाणार असल्याचे सांंगणारे काका साठे यांनी ‘मनासारखा निर्णय न झाल्यास आपला मार्ग मोकळा आहे,’ असा सूचक इशाराही दिला आहे, त्यामुळे सोमवारी मुंबईत होणाऱ्या भेटीकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
साठेंच्या जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीस विलंब का?
दरम्यान, प्रदेश पातळीवरील एका मोठ्या नेत्याचा दोन जिल्हाध्यक्ष नेमण्यास विरोध असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच बळीराम साठे यांच्या पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीस विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनीच दोन जिल्हाध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या निर्णयाला विरोध होईल का, असा सवाल काही जणांकडून उपस्थित केला जात आहे.
कार्यकारिणीसाठी नावे देण्यास नकार
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख आणि कार्याध्यक्षांनी जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांचा दौरा केला आहे. तालुका अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणीवर कोणाला संधी द्यायची, याबाबतची चर्चा त्यांनी केली आहे. तशी चर्चा करण्यासाठी देशमुख आणि कार्याध्यक्ष हे वडाळ्यात साठे यांच्याकडे गेले होते. मात्र, साठे यांनी कोणतीही नावे दिली नाहीत, असे सांगण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.