Nagpur News: फक्त खानापूर्ती नकोय! नागपूर पदवीधरसाठीच्या इच्छुकांना मुख्यमंत्र्यांची कडक शब्दांत तंबी
Nagpur News: नागपूर विभागीय पदवीधरच्या मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेला पराभव भाजपचा अद्यापही खुपत आहे. मागल्या निवडणुकीत झालेली चूक यावेळी होऊ द्यायची नाही असे भाजपने ठरवले आहे. सोमवारी नागपूरमध्ये झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या इच्छुक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना चांगलाच दम दिला. महिनाभराच्या आत घरोघरी जा आणि प्रत्येकी हजार मतदारांचे फॉर्म भरून आणा अशी सूचना केली. केवळ खानापूर्ती करून चालणार, प्रत्येकाच्या कामाची दखल घेतली जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
भाजपने माजी आमदार सुधाकर कोहळे यांना पदवीधर मतदारसंघाचे नोंदणी प्रमुख म्हणून नियुक्त केले. त्यामुळे कोहळे हेच भाजपचे उमेदवार राहणार आहे. माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीसुद्धा कोहळे हेच आमचे उमेदवार असल्याचे यापूर्वी जाहीर केले आहे. पदवीधर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. याच मतदारसंघातून ते विधान परिषदेत दाखल झाले होते. येथूनच त्यांची राजकीय कारकीर्द बहरली. गडकरी खासदार झाल्यानंतर अनिल सोले यांनीसुद्धा त्यांचा वारसा सांभाळला होता.
मागील निवडणुकीत भाजपने माजी महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांनी त्यांना पराभवाचा धक्का दिला होता. आजवर झालेल्या पदवीधरच्या निवडणुकीत हा भाजपला पहिला पराभव होता. या पराभवाची सल भाजपला बोचत आहे. पराभवाचे उट्टे काढण्याचे भाजपने ठरवले आहे. वंजारी निवडून आले तव्हा राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती. सुनील केदार, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार या सारखे दिग्गज नेते मंत्रिमंडळात होते. आता राज्यात भाजप महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत भाजपला हा मतदारसंघ जिंकायचा आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला ओव्हर कॉन्फिडंस होता. त्याचा मोठा फटका पक्षाला बसला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचेसुद्धा मताधिक्य कमी झाले. त्यामुळे याची खबरदारी आत्तापासूनच घेताना भाजपचे नेते दिसत आहेत.
पदवीधरच्या आधी महापालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणूक लढायला भाजपचे हजारो उमेदवार इच्छुक आहेत. ज्यांना स्थानिकची निवडणूक लढायची आहे त्यांना पदवीधरच्या निवडणुकीचे काम करण्यास बजावण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे तिकीट वाटप करताना पदवीधरची कोणी किती नोंदणी केली याचाही हिशेब पक्षातर्फे ठेवला जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तसे स्पष्ट केले आहे. काही काम केले नाही तर बिघडत नाही, तिकीट भेटणारच आहे या भ्रमात कोणी राहू नये. प्रत्येकाच्या कामावर आमची नजर आहे. निव्वळ खानापूर्ती करून चालणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सर्वांना बजावले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.