Ghatkopar landslide : राजधानी मुंबईत मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. घाटकोपर आणि साकीनाका परिसराच्या मध्यावर असलेल्या अशोक नगर येथील गौसिया चाळ परिसरात डोंगराचा मोठा भाग कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी दिली आहे. तर पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ही घटना बुधवारी (12 ऑगस्ट) पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे. मध्यरात्रीनंतर परिसरातील बहुतांश नागरिक झोपेत असतानाच अचानक डोंगराचा मोठा भाग गौसिया चाळ परिसरातील घरांवर कोसळला. या दुर्घटनेत दोन ते तीन घरे मोठ्या प्रमाणात बाधित झाली असून काही घरे ढिगाऱ्याखाली गेल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी प्रशासनाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि घाटकोपर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, यादव विकी, वाजिद अली, आरिफ शेख, मन्नत, आबन शेख आणि सद्दाम शेख हे नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, बचावकार्य सुरू असल्याने अडकलेल्या आणि जखमींची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील डोंगराळ आणि धोकादायक भागांमध्ये प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.