
Pune, 12 August : कायदेशीर परवानगी असलेल्या पशुधन वाहतुकीदरम्यान वाहनचालकांना त्रास देणाऱ्या गोरक्षकांवर अंकुश ठेवावा आणि जिल्हा पोलिस प्रमुखांनी अशा वाहनांची तपासणी करणाऱ्या खासगी व्यक्तींवर कारवाई करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्यानंतर गोरक्षकांचं नेतृत्व करणाऱ्या मिलिंद एकबोटे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. त्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यामुळे गोरक्षक आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष पुढील काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
राज्यभरात भाकड म्हशीची खरेदी विक्री करणाऱ्या कुरेशी समाजाला (Qureshi Samaj) गोरक्षकांकडून त्रास दिला जात आहे, असा आरोप कुरेशी समाजाकडून करण्यात आला होता. त्यासाठी नुकतेच राज्यभरात कुरेशी समाजाकडून मूकमोर्चा देखील काढण्यात आला. म्हशींच्या खरेदी-विक्री करता वाहतुकीदरम्यान गोरक्षकांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाच्या विरोधात हे मोर्चे काढण्यात आले होते.
कुरेशी समुदायाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेत आपल्या अडचणी सांगितल्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी कायदेशीररित्या परवानगी असलेल्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना त्रास देणाऱ्या गोरक्षकांना आवर घाला. तसेच, जिल्हा पोलिस प्रमुखांनी पशुधन वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करणाऱ्या खासगी व्यक्तींना रोखावं, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
काय म्हणाले मिलिंद एकबोटे?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या आदेशावर गोरक्षकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिलिंद एकबोटे (Milind Ekbote) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकबोटे म्हणाले, अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये कसाई यांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर अजित पवार यांनी कसाई आणि शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, असं सांगितलं.
हे कसाई गेल्या शंभर वर्षांपासून आमच्या देशातील पशुधन संपवायला निघाले आहेत. पशुधन संपल्यामुळे भेसळयुक्त दूध लोकांना प्यायला लागत असून संस्कृतीलाही धक्का बसत आहेत. या सर्व गोष्टींचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काहीच वाटत नाही. याबाबत मला खेद वाटत आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने कसाई यांची बैठक घेतली, त्याच पद्धतीने गोरक्षकांचीही बैठक घ्या, अशी मागणी केली आहे.
एकबोटे यांनी एक कार्यक्रमात बोलताना अजित पवारांवर हल्ला करत ‘अजित पवारांना जनाची नाही, तर मनाची तरी आहे की नाही?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. लोकसभेला पवारांना एकच जागा मिळाली. पण, मोदींच्या आशीर्वादाने त्यांना उपमुख्यमंत्रिपद मिळाले आहे, याची जाणीव पवारांनी ठेवावी, असेही त्यांनी सुनावले.
रुपाली ठोंबरे पाटलांचे सडेतोड उत्तर
मिलिंद एकबोटे यांनी अजितदादांवर केलेल्या टीकेला पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ठोंबरे पाटील म्हणाल्या, अजितदादांची लाज काढणारे मिस्टर एकबोट्या, तुमच्या घरी गाय नसेलच म्हणा. ये आपल्या दादांच्या गोठ्यात जाऊन ये बाबा. त्या गाईचं शेणमूत काढून तुमची पूर्वीची पापं तरी धुतली जातील. अजितदादांबद्दल भाषा नीट, म्हणजे नीटच वापरायची. कायद्यात राहताल, तरच फायद्यात राहताल बरे, असा थेट इशाराच रूपाली ठोंबरेंनी दिला आहे.
दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचार नसानसांत भिनवा पहिले. सोईचे विचार चालत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे भुरट्या लोकांना कडेलोट किंवा हत्तीच्या पायाखाली देत होते, असा इशाराही रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.