
Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपमधील काही इच्छुक उमेदवारांना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सांगून त्या पक्षाकडून उमेदवारी मिळवून दिली होती. त्यातून त्यांनी महाविकास आघाडीकडे जाऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांचा ओढा थांबवत मित्रपक्षांनाही भाजपमधील तगडे उमेदवार देऊन बळ देण्याचे काम केले होते. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणाऱ्या या डझनभर नेत्यांचे नेमके काय झाले ? याची उत्सुकता सर्वाना लागली आहे.
महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निवडणुकीत एक नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. भाजपने जवळपास 12 नेत्यांना विधानसभेचे तिकीट मिळण्यासाठी महायुतीच्या इतर मित्रपक्षांमध्ये प्रवेश केला. एवढंच नाही तर या नेत्यांनी महायुतीतील मित्र पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना लगेच तिकीट देखील देण्यात आले. त्यामधील जवळपास 9 जण यशस्वी ठरले तर 3 जणांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
या डझनभरापेक्षा अधिक उमेदवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, महायुतीमधील प्रत्येक पक्षाला मिळालेल्या जागा आणि त्यामध्ये सर्वात मजबूत उमेदवार उभा केला जाईल, याची खात्री करत उमेदवारी दिली जात असून महायुतीमधील या समन्वयाच्या भूमिकेमुळे भाजप व मित्रपक्षाचा फायदा झाला आहे. त्याशिवाय महाविकास आघाडीकडे होणारे आऊटगोइंग थांबविण्यात यश आले.
या भाजपमधून इतर पक्षात पाठविण्यात आलेल्या नेत्यांमध्ये भाजपचे नेते नीलेश राणे (Nilesh Rane) यांचा समावेश आहे. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर लगेचच कुडाळमधून उमेदवारी मिळाली. राणे हे विजयी झाले त्यांनी ठाकरे गटाचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांचा पराभव केला. त्यानंतर लोहा कंधार मतदार संघातून नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपसोडून हातात घड्याळ घेतले होते. त्यांनी कंधार-लोहा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी याठिकाणी त्यांच्या भगिनी व शेकापच्या उमेदवार आशा शिंदे व ठाकरे गटाचे उमेदवार एकनाथ पवार यांचा पराभव केला.
सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांनी घड्याळ हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांना तासगावमधून उमेदवारी मिळाली. मात्र, त्यांना याठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तरुण आमदार रोहित पाटील विजयी झाले. तर विदर्भातील भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांना अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली होती त्याठिकाणी बडोले विजयी झाले आहेत.
कन्नड मतदारसंघात भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या संजना जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या याठिकाणी विजयी झाल्या त्यांनी त्यांचे पती हर्षवर्धन जाधव व विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत यांचा पराभव केला. मुंबादेवीमधून भाजपच्या नेत्या शायना एनसी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या ठिकाणी काँग्रेसचे आमदार अमीन पटेल विजयी झाले आहेत.
बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेत प्रवेश करून हातात धनुष्यबाण घेतला होता त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. याठिकाणी ठाकरे गटाचे दिलीप सोपल विजयी झाले आहेत तर तर अंधेरी पूर्वमधून मुरजी पटेल यांनी ही उमेदवारीला मिळवण्यासाठी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता ते विजयी झाले आहेत त्यांनी ठाकरे गटाचं ऋतुजा लटके यांचा पराभव केला होता. पालघरमध्ये भाजपसोडून हातात धनुष्यबाण घेतलेल्या राजेंद्र गावित विजयी झाले. तर बोईसर मतदारसंघातून शिवसेनेत प्रवेश केलेले विलास तरे हे विजयी झाले. त्यामुळे जवळपास डझनभरापेक्षा अधिक भाजपमधील मंडळींनी शिवसेना व भाजपमध्ये प्रवेश करीत उमेदवारी मिळवली अन ते विजयी झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.