
Dharashiv News : धाराशिवमधील राजकारणाचा पॅटर्न नेहमीच वेगळा राहिला आहे. 1995 पूर्वी धाराशिव जिल्ह्यावर काँग्रेसचे एकहाती वर्चस्व होते. त्यानंतर 1995 पासून हा जिल्हा एकसंध शिवसेनेचा गड राहिला आहे. तर त्यानंतरच्या काळात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेही काही प्रमाणात वर्चस्व राहिले आहे. दुसरीकडे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा परिणाम येथील राजकारणावर झाला आहे. या फुटीमुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकारण 360 डिग्रीमध्ये बदलले आहे.
दोन पक्षात पडलेल्या फुटीनंतर नेतेमंडळी इकडे-तिकडे गेले असले तरी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. लोकसभेसह विधानसभेच्या दोन जागा जिंकत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर फुटीचा परिणाम जाणवू दिला नाही. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तानाजी सावंत याठिकाणी निसटत्या मतांनी विजयी झाले तर खासदारकीच्या निवडणुकीत याठिकाणी ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेली आघाडी निश्चितच महायुतीच्या नेत्यासाठी धोक्याची घंटा आहे.
पक्षफुटीनंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी महायुतीमधील तीन पक्षात रस्सीखेच होती. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी मोठी स्पर्धा होती. मात्र, यामध्ये ओमराजे निंबाळकर यांना तगडी लढत देईल, असा उमेदवार रिंगणात उतरविण्यात मात्र महायुतीला अपयश आले. या ठिकाणच्या विद्यमान आमदारांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास नकार दर्शवला.
त्यामुळे ऐनवेळी भाजप (BJP) आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढली होती. विशेषतः या लोकसभा मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार असताना देखील महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर ३ लाख ३० हजार मताधिक्यांनी विजयी झाले होते. त्याचवेळी महायुतीने सावधगिरीने पावले उचलली, त्यामुळे विधानसभेचा सामना महायुतीने दोन तर महाविकास आघाडी दोन असा बरोबरीत सोडवला होता.
विधानसभेच्या निवडणुकीत कळंब-धाराशिव मतदारसंघातून कैलास पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार पुन्हा निवडून आले. ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिल्याचा त्यांना फायदा झाला तर दुसरीकडे उमरगा राखीव मतदारसंघातून तीन वेळा विजयी झालेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना ठाकरे सेनेच्या नवख्या प्रवीण स्वामी यांना पराभूत केले. चौगुले यांना ठाकरे यांची शिवसेनेची साथ सोडल्याचा फटका बसला तर तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे राणाजगजीतसिंह पाटील दुसऱ्यांदा विजयी झाले.
त्याचवेळी भूम-परंडा मतदारसंघात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी आमदार राहुल मोटे निवडणूक रिंगणात उतरले होते. या ठिकाणी राहुल मोटे यांनी मंत्री असलेल्या सावंत यांना मतमोजणीवेळी शेवटच्या फेरीपर्यंत झुंजवले होते. याठिकाणी सावंत केवळ दीड हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते. या निकालानंतर फेरमतमोजणी करावी यासाठी मोटे कोर्टातही गेले होते.
दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये तानाजी सावंत यांचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे सावंत नाराज आहेत. या नाराजीतूनच त्यांनी मतदारसंघाकडे पाठ फिरवली आहे. गेल्या आठ महिन्यात ते एकदाही मतदारसंघात फिरकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात नाराजी दिसून येते. विशेष म्हणजे २०१९ साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये त्यांना संधी देण्यात आली नव्हती. त्यावेळी त्यांनी सुरुवातीचे अडीच वर्ष मतदारसंघाकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर ते धाराशिवचे पालकमंत्री झाले होते. त्यानंतर तयांनी अडीच वर्ष मतदारसंघात ये-जा देखील वाढवली होती.
सध्या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे आहेत. मात्र, सावंत एकाही डीपीडीसीच्या बैठकीला हजर राहिले नाहीत. त्यातच आता आतापर्यंत विरोधात असलेल्या राहुल मोटे यांनी महायुतीमधील अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता भूम-परंडा मतदारसंघातील चित्र येत्या काळात बदलणार आहे.
आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये नव्याने आलेले राहुल मोटे येत्या काळात तानाजी सावंत यांच्यासोबत जुळवून घेणार का ? विरोधात भूमिका घेणार यावर बरेच काही अवलंबुन असणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून अजितदादांचे धाराशिवमधील भूम-परंडा या मतदारसंघावर लक्ष होते. मात्र, महायुतीमधील मित्रपक्षाची नाराजी नको म्हणून त्यांनी कोणातच निर्णय घेतला नव्हता.
गेल्या काही दिवसात मात्र महायुतीमधील तीनही पक्षात एकमेकांवर कुरघोडी केली जात आहे. महायुतीचे आमदार असलेल्या काही मतदारसंघात त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या नेत्याला गळाला लावले जात आहे. त्यामुळे सध्या २०२९ ची निवडणूक डोळयासमोर ठेवून प्लॅनींग केले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच अजितदादांनी संधी मिळताच नाराज असलेल्या तानाजी सावंत यांच्या विरोधात निवडणूक लढलेल्या राहुल मोटे यांना पक्षप्रवेश देत एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.
अजितदादा व तानाजी सावंत यांच्यात फारसे सख्य नाही. दोघांचेही राजकारण ऊस, साखर कारखानदारावर अवलंबुन आहे. त्यामुळेच त्यांचे फारसे जमत नाही. कॅबिनेटच्या बैठकीला अजित पवार यांच्यासोबत बसल्याने मळमळ होते, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले होते. त्यामुळे वादही उफाळून आला होता. त्यातच आता अजितदादांनी संधी मिळताच एकनाथ शिंदे यांना धाराशिवमध्येही अडकावून ठेवत कोंडी केली आहे. विशेषतः गेल्या टर्ममध्ये एकसंध शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले होते. त्यावरून आता सावंत यांच्या रूपाने कमी फरकाने एकच आमदार निवडून आला असताना त्याच्या विरोधात लढवय्या नेत्याला रिंगणात उतरवत शिंदेंची कोंडी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.