Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग होत आहे. त्यामध्ये सर्वाधिक इनकमिंग भाजपमध्ये होत आहे. विशेषतः गेल्या काही दिवसापासून भाजपला हाऊसफुल्ल असा बोर्ड लावण्याची वेळ आली असली तरी इतर पक्षातून येणाऱ्या नेत्याची रांगच सध्या लागली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून नाशिक, सोलापूर अन् सांगलीतून मेगाभरतीविरोधात स्थानिक नेत्यांनी आवाज उठवला आहे. या ठिकाणच्या भाजपच्या आमदारांनी या भरतीविरोधात सीएम देवेंद्र फडणवीसांकडेच तक्रार केली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच भाजपमधील निष्ठावंत नेत्यावर अन्याय होत असल्याने आता भाजप आमदारच नडत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. त्यामुळे भाजपची मजबूत असलेली पक्षसंघटना विस्फोटाच्या उंबरठ्यावर दिसत आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुतीमधील नेतेमंडळी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपमध्ये (BJP) गेली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुफडासाफ करीत एकहाती विजय मिळवत महायुती सत्तेत आली. त्यामुळे दिवस फिरताच पुन्हा महाविकास आघाडीमधील काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात महायुतीमध्ये प्रवेश होत आहेत. येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे प्रवेश होत आहेत.
महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shivsena) व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे प्रवेश झाले आहेत. या नेतेमंडळींकडून आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रवेश केले जात आहेत. विशेषतः भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, याचा फटका गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने पक्षवाढीसाठी प्रयत्न करीत असलेल्या नेतेमंडळीना बसणार आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिकच्या निवडणुकीतही इतर पक्षातून आलेल्या नेत्यांचा प्रचार करायचा का प्रश्न निष्ठावंत कार्यकर्त्यांना सतावत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे कार्यकर्ते खूप दिवसापासून निवडणुकीची तयारी करीत आहेत. विशेषतः गेल्या पाच वर्षांपासून स्थानिकच्या निवडणूका झालेल्या नाहीत. त्यामुळे एकीकडे कार्यकर्त्यांना खूप दिवसानंतर संधी मिळणार आहे. त्यामुळे उत्सुकता लागली असतानाच आता इतर पक्षातून येणाऱ्या नेत्याचा प्रचार करावा लागणार असल्याने आता कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. त्याचा उद्रेक आता पाहवयास मिळत आहे.
नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून आलेल्या अनेक नेतेमंडळींना प्रवेश देण्यात आला. त्यामध्ये काही माजी नगरसेवकांचा प्रवेश केला होता. विशेष म्हणजे येथील आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला कडाडून विरोध केला होता. त्यानंतरही भाजपने बडगुजर यांना प्रवेश देण्याचे निश्चित केले होते. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी पसरली होती. या विरोधात भाजपच्या स्थानिक नेत्यांसह आमदार फरांदे, हिरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करीत शेवटी बडगुजराना प्रवेश देण्यात आला.
त्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदारांना गळाला लावले आहे. विशेषतः मित्र पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे तीन बडे नेते आहेत. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने व माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी प्रवेशही केला. त्यांच्या प्रवेशाला कोणी विरोध केला नाही. मात्र दक्षिण सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्ष प्रवेशाला भाजप नेत्यांनी विरोध केला. त्यांच्या प्रवेशाला विरोध करीत आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप शहर कार्यालयांसमोर आंदोलन केले होते. त्याची दखल भाजप पक्ष श्रेष्ठीने घेतली आहे. त्यानंतर काही दिवसासाठी मानेंचा प्रवेश थांबवला होता.
या सर्व घटनाक्रमनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोलापूर दक्षिणमधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी माने यांचा प्रवेश निश्चित आहे. मात्र, आपल्यावर अन्याय होणार नाही याची काळजी पक्ष घेईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे माने यांचा प्रवेश आठ- दहा दिवसांत होणार आहे. मात्र, तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष चव्हाण हे आमदार सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर माने यांच्या प्रवेशाची तारीख नक्की होणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
दुसरीकडे माजी मंत्री व सोलापूर उत्तरचे आमदार विजय देशमुख यांच्या विरोधात सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी भाजपचे प्रदेश संघटनमंत्री राजेश पांडे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामध्ये देशमुख हे कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे आम्हाला मतदारसंघात पर्यायी यंत्रणा उभारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीत यश मिळवण्यासाठी शहरातील तीन ही आमदाराकडून अपेक्षित प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. मात्र सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पक्षाचे कार्यक्रम राबवले जात नाहीत. हे उघड आहे, त्याबद्दल लवकरच प्रसार माध्यमांशी बोलणार असल्याचे रोहिणी तडवळकर यांनी स्पष्ट केले आहे.
या सर्व घटनाक्रमामुळे सोलापूर शहर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आमदार विजय देशमुख यांनी शहराध्यक्ष पदासाठी दिलेली नावे वगळून रोहिणी तडवळकर यांची वर्णी लागली होती. त्यामुळे विजय देशमुख समर्थकानी पक्षाचे दिलेले राजीनामे अजूनही मागे घेतले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर तडवळकर यांनी केलेल्या तक्रारीला महत्व प्राप्त झाले आहे.
सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेविरोधात लेटरबॉम्ब टाकल्यानंतर जिल्ह्यातील भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. त्यानिमित्ताने नवे-जुने पदाधिकारी असा वाद निर्माण झाला आहे. सांगली भाजपमधील निष्ठावंत नेत्यांनी प्रसार माध्यमाला दिलेले पत्र पुढे आल्यानंतर याठिकाणाचा वादही चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी येत्या काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीत निष्ठावंत नेत्यावर अन्याय करू नका, असा सूर आवळला आहे.
सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी देण्याची घोषणा केल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. काँग्रेस व इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या २२ पदाधिकाऱ्यांना महापालिकेची उमदेवारी देण्याचे वक्तव्य केले होते. काँग्रेसमधून जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील भाजपमध्ये आल्यानंतर समीकरणे बदलली आहेत. त्यांच्याही सहकाऱ्यांना न्याय देण्याच्या भावनेतून पालकमंत्री पाटील, असे म्हणाले असतील, अशी चर्चा आहे. त्यातच पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पुन्हा एकदा सांगली दौऱ्यावर येत आहेत. या सांगली दौऱ्यात चंद्रकांत पाटील नेमके या ‘लेटर बॉम्ब विरोधात काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे.
एकदंरीतच गेल्या काही दिवसातील भाजपमधील हालचाली पाहता निष्ठावंत नेतेमंडळीत असंतोष पसरला आहे. त्यांच्यावर पक्षाकडून अन्याय केला जात असल्याची भावना आहे. इतर पक्षातून आलेल्या नेतेमंडळींना प्रवेश देत असताना स्थानिक नेत्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. ज्या नेत्याला विरोध करण्यात या नेत्यांने आयुष्य घालवले. त्या नेत्यांनाच प्रवेश न विश्वासात घेता दिला जात असल्याने नाराजी आहे. त्यामुळेच त्याचा उद्रेक पाहवयास मिळत आहे.
गेल्या काही दिवसापासून नाशिक, सोलापूर अन् सांगलीतील मेगाभरतीच्याविरोधात स्थानिक नेत्यांनी आवाज उठवला आहे. या ठिकाणच्या भाजपच्या आमदारानी या मेगाभरतीविरोधात सीएम देवेंद्र फडणवीसांकडेच तक्रार केली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच भाजपमधील निष्ठावंत नेत्यावर अन्याय होत असल्याने आता भाजप आमदारच नडत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात यामधून मार्ग काढण्यासाठी भाजपच्या नेतेमंडळींकडून याबाबत कोणती भूमिका घेणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.