
Mumbai News : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि आता नव्याने मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्त झालेले देवेन भारती, हे दोघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील अधिकारी आहेत. दोन्ही मुख्य पदांवर आता फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अधिकारी बसले आहेत. या मर्जीतील दोन अधिकाऱ्यांनी या पदावर बसविण्यासाठी त्यांना मोठा आटापिटा करावा लागला.
राज्यात तीन वर्षापूर्वी सत्तांतर झाल्यापासून राज्यातील पोलिस प्रशासनात झालेल्या उच्चपदस्थ नियुक्त्यांवर पुन्हा एकदा राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे जाणवत आहे. राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून, त्यामागे ठोस राजकीय पार्श्वभूमी असल्याचे दिसते.
विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय म्हणून या दोघाना ओळखले जाते. सत्तेतील व्यक्तींनी प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर विश्वासू अधिकाऱ्यांची नेमणूक करणे ही काही नवीन गोष्ट नाही, मात्र लोकशाही व्यवस्थेत अशा नियुक्त्यांकडे अधिक साशंकतेने पाहिले जाते. कारण प्रशासन हे राजकारणापेक्षा वेगळं, पारदर्शक आणि निष्पक्ष असावं, ही लोकशाहीची मूलभूत अपेक्षा आहे.
यापूर्वीही राज्यात महाविकास आघाडीचे (MVA) सरकार सत्तेत आल्यानंतर परमबीर सिंग यांची नियुक्ती आणि त्यानंतरची बदली. रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिफोन टॅपिंगचा आरोप आणि नंतर सत्तांतरानंतरची पुनर्नियुक्ती, देवेन भारती यांची विविध पदांवर नियुक्ती हा सर्व घटनाक्रम पहिला तर हे बदल अधिकाऱ्यांच्या पदांवरही थेट परिणाम घडवतात, असेच दिसते.
मुंबई पोलीस आयुक्तपदी बुधवारी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली. विद्यमान पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर बुधवारी सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई पोलीस आयुक्तपदी भारती यांची नियुक्त केली असली तरी दोन ज्येष्ठ अधिकारी व अन् लेडी सिंघमचा पत्ता कट झाला.
सेवा ज्येष्ठतेनुसार महासंचालक संजयकुमार वर्मा, प्रतिनियुक्तीवर असलेले ‘एनआयए’चे प्रमुख सदानंद दाते आणि पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी यांचीही नावे चर्चेत होती. पण या तिघांचाही पत्ता कट झाला आहे. त्यागी यांची नियुक्ती झाली असती तर त्या मुंबईच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त ठरल्या असत्या. या पदावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि मर्जीतील अधिकारी अशी ओळख असलेल्या देवेन भारती यांची नियुक्ती झाली आहे.
मुळचे बिहारचे असलेल्या देवेन भारती यांनी महाराष्ट्र पोलिसांमध्ये अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. यापूर्वी ते पोलिस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) होते. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) म्हणून त्यांचा कार्यकाळ गाजला होता.
26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा केला होता तपास
त्या शिवाय मागच्या टर्ममध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना, भारती यांनी मुंबईतील काही हाय-प्रोफाइल प्रकरणांचा कसून तपास केला. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आणि ज्येष्ठ पत्रकार जे डे यांच्या हत्येच्या तपासात त्यांचा सहभाग होता. 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला फाशी देण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने देवेन भारती यांच्यावर सोपवली होती. दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत असताना महत्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली होती. पण 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर त्यांना साईड लाइन करण्यात आले होते. त्यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक करण्यात आले होते.
2022 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पाय उत्तर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेत आले होते. त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यावेळी भारती यांच्याकडे पुन्हा क्रीम पदावर पोस्टिंग झाली. भारती यांची यावर्षी मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या इतिहासात प्रथमच विशेष आयुक्त (स्पेशल सीपी) हे पद निर्माण करण्यात आले. त्यांनाच या पदावर पहिली नियुक्ती मिळाली होती.
रश्मी शुक्ला यांची कारकीर्दही वादग्रस्तच
दुसरीकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेल्या रश्मी शुक्ला 1988 च्या बॅचच्या आयपीएस आहेत. त्यांची कारकीर्द मोठ्या वादात सापडली होती. महाविकास आघाडीमधील काही राजकीय नेत्यांची फोन टॅपिंग प्रकरणात त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना रश्मी शुक्ला यांच्यावरती पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणी वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, संजय काकडे, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांची फोन टॅपिंग प्रकरणाची त्यांच्यावर आरोप होते. पुढे दोन्ही गुन्हे कोर्टाने रद्द केले होते. रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त महासंचालक म्हणूनही काम केले आहे. रश्मी शुक्ला यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त आणि राज्य गुप्तचर शाखेचे संचालक म्हणून काम केले आहे.
रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. यातच शरद पवार गटाचे आमदार आणि नेते एकनाथ खडसे म्हणाले, रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली होती. त्यामुळे राज्यात महायुतीचे एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांची बढती होईल.
2022 मध्ये राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार येताच यांच्यावरती पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात आले. त्याशिवाय त्यांची पुन्हा मोठ्या पदावर वर्णी लावण्यात आली. रश्मी शुक्ला यांची ओळख देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निकटवर्तीय अशीच राहिली आहे. त्याचा फायदा त्यांना झाला.
रश्मी शुक्ला यांची सेवा जून 2024 रोजी समाप्त झाली असतानाही महायुती सरकारने जानेवारी 2026 पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा राज्याचे पोलीस महासंचालकपद रश्मी शुक्ला यांच्या हाती सोपवण्यात आले आहे.
राज्यातील सत्ताधाऱ्यांनी विश्वासू अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवणे समजण्यासारखे आहे, पण त्याच वेळी ही निवड संस्थात्मक मूल्ये, पारदर्शकता आणि वरिष्ठतेच्या आधारे असावी, ही लोकशाहीची अपेक्षा आहे. अन्यथा, येत्या काळात पोलीस दल हे राजकीय शस्त्र बनण्याची भीती नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.