Election News : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभरात मंगळवारी तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यात 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 94 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यात एकूण 64.08 टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाल्याचे सायंकाळी आलेल्या बघायला मिळालं. तर महाराष्ट्रातील अकरा जागांसाठी सरासरी 61.44 टक्के मतदान झाल्याचा निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार प्राथमिक अंदाज आहे.
या निवडणुकीत कमी झालेली मताची टक्केवारी महाविकास आघाडी (MVA) की महायुती (MAHYUTI) कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. विशेषतः सुरुवातीच्या पहिल्या दोन टप्प्यात राज्यात कमी मतदान झाले. त्यामुळे मताचा घसरता टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. (Lok Sabha Election 2024 News)
राज्यातील मतांची ही आकडेवारी 2019 च्या तुलनेत कमी आहे. निवडणूक आयोगाच्या अंतिम आकडेवारीनुसार मतटक्का वाढण्याची शक्यता असली तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हा मतटक्का घसरताना दिसत आहे. बारामती मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunanda Pawar) या नणंद-भावजयीत लढत झाली. या संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात 56.07 टक्के मतदान झाले.
तिसऱ्या टप्प्यातील या मतदानाचे निरीक्षण केले तर पीएम मोदी यांनी सात मतदारसंघात तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नऊ ठिकाणी सभा घेत जवळपास सर्व मतदारसंघ पिंजून काढले. त्यामुळे हे दोन्ही प्रमुख नेत्यांच्या सभेला मोठी गर्दी झाली होती. मात्र ही गर्दी मतात रूपांतर करण्यात यशस्वी होतात, का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तिसऱ्या टप्प्यातील या निवडणुकीचे वर्णन करायचे झाले तर अगदी संथ अशी लोकसभा निवडणूक,असे करता येईल. कुठल्याच विकासात्मक मुद्दयांवर ही निवडणूक होत नसल्याने विकासाचे मुद्दे भरकटलेले दिसत आहेत. त्यामुळे राजकीय नेते विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी आरोप-प्रत्यारोप करीत एकमेकांवर सभेतून चिखलफेक करताना दिसत आहेत. भाजपकडून असली शिवसेना व नकली शिवसेना म्हणत सेना नेते उद्धव ठाकरेंना डिवचत आहेत. तर दुसरीकडे या आरोपांवर उत्तर देण्यातच शिवसेनेचा बराचसा वेळ जात आहे. त्यामुळे ही निवडणूक पूर्णपणे भरकटलेली दिसत आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलन करीत असलेल्या मनोज जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेला मराठा समाजातून पाठिंबा मिळतो की नाही हे पाहण्यासाठी सर्वांना 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे. आतापर्यंत या निवडणुकीत मतदानाचे एक एक टप्पे करीत तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. आता दोन टप्पे राहिले आहेत. त्यामध्ये उर्वरित टप्प्यानुसार निवडणुकीतील मुद्दे आता बदलणार आहेत. गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर सत्ताधारी काहीच बोलत नाहीत तर विरोधक या प्रश्नावरून सरकारला घेरण्याची संधी असताना हे मुद्दे मांडत नाहीत.
राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला राज्यातील जनता कंटाळली आहे. या पाच वर्षांत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष झाले तर काँग्रेसमधील बरेच नेते भाजपने फोडले. त्यामुळे या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे.
मंगळवारी तिसऱ्या टप्प्यात राज्यात सरासरी 61.44 टक्के मतदान झाले आहे. गेल्या 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान कमी झाले आहे, तर दुसरीकडे 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत ही टक्केवारी कमी आहे. त्यामुळे हा कमी झालेल्या मतांचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत महायुतीचा फायदा होणार की महाविकास आघाडीचा हे समजून येण्यासाठी सर्वांना 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे.
मतदार संघ 2024साली व 2019 साली झालेले मतदान
लातूर 60.18% 62.44%
सांगली 60.95% 65.92%
बारामती 56.07% 61.82 %
हातकणंगले 68.07% 70.60%
कोल्हापूर 70.35% 70.86%
माढा 62.97% 63.77%
धाराशिव 60.91% 63.76%
रायगड 58.10% 62.17%
रत्नागिरी-सिंधुदुर्ग 59.23% 61.99%
सातारा 63.05% 60.47%
सोलापूर 57.61% 58.67%
एकूण : 61.44 % 64.17 %