
Mumbai News : येत्या काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. कोर्टाने 31 जानेवारीपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यंत्रणा कामाला लागली आहे. त्यातच या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी महायुती एकत्र लढणार असतानाच महविकास आघाडीत मात्र फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून आघाडीबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लोकसभा, विधानसभेत एकत्रित लढलेल्या महाविकास आघाडीत स्थानिकच्या निवडणुकीसाठी फूट पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची शक्यता गृहीत धरून काँग्रेसने 'एकला चलोरे'चा नारा दिला असण्याची शक्यता आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका गेल्या पाच वर्षांपासून रखडल्या आहेत. या रखडलेल्या निवडणुकीला आता कोर्टानेच आदेश दिला असल्याने मुहूर्त लागला आहे. त्यामुळे निवडणुकीचे काम वेगाने सुरु आहे. गेल्या तीन वर्षात राजकारणाचा कूस पूर्णपणे बदलला आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर राजकारणात मोठी चुरस पाहावयास मिळत आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने (MVA) बाजी मारली होती तर विधानसभेत महायुतीने एकत्र येत मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे हा सामना एक-एक असा बरोबरीत सुटला आहे. त्यानंतर आता होत असलेल्या स्थानिकच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? यावर बरेच काही चित्र अवलंबुन असणार आहे. त्यामुळे स्थानिकच्या निवडणूक निकालाकडे लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती व महाविकास आघाडीची बोलणे सुरु आहेत. त्यानुसारच निर्णय घेतला जात आहे. मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आघाडीची साथ सोडून मनसेला सोबत घेण्याची शक्यता आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीत नाराजीनाट्य रंगले आहे. ठाकरे यांची शिवसेना मनसेसोबत युती करण्यास उत्सुक आहे. त्यामुळे येत्या काळात ते मनसेसॊबत आघाडीत येणार का? दुसरीकडे मनसेसाठी महाविकास आघाडीची साथ सोडणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
महायुतीने मात्र त्यांच्या रणनीतीत लगेच बदल केला आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा फायदा या दोघांना मुंबईत होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे टाळून एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे याठिकाणी काही अंशी महायुतीचा येत्या काळात फायदा होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीत मात्र काहीच आलबेल नाही. काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरेंची शिवसेना हे तीन पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीसाठी हे तीन पक्ष एकत्र येण्याची शक्यता धूसर होत चालली आहे.
स्थानिकच्या निवडणूका तोंडावर आल्या असतानाच आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून करण्यात आलेल्या वाटाघाटीमध्ये कुठेतरी उणीवा राहिल्या होत्या. लोकसभेच्या 48 जागा आणि विधानसभेच्या 288 जागांची वाटाघाटी राज्यपातळीवर केल्यामुळे उणीवा राहिल्या आणि आता जर स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय घेतल्यास गोंधळ होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती आघाडी करण्याचा सर्वस्वी अधिकार स्थानिक युनिटला काँग्रेसने देण्याचे ठरवले आहे. युती आघाडी करत असताना कोणत्यातरी पक्षाचे नुकसान होत असते. लोकसभा आणि विधानसभेला महाविकास आघाडी लढल्यामुळे अनेक ठिकाणी पंजा गायब झाला. त्यामुळे आमचे सिम्बॉल सर्वत्र पोहोचू शकले नाही. त्यामुळे पक्ष कमजोर होत चालला आहे, अशा कार्यकर्त्यांच्या तक्रारी येत असल्याने सपकाळ यांनी येत्या काळात काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्थानिकच्या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मोठी दरी पडली असून त्यामुळे भवितव्य धोक्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.