Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या कामाला लागला आहे. महाविकास आघाडी व महायुतीमधील तीनही मित्रपक्ष तयारी करीत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच उद्धव व राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
एकीकडे मनसे व शिवसेना ठाकरे गटाच्या एकत्र येण्याच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा असतानाच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत सस्पेन्स वाढवला आहे. फडणवीस यांच्या भेटीनंतरचा तपशील बाहेर आला नसला तरी राज ठाकरेंनी मात्र त्यांची भूमिका स्पष्ट केली नसल्याने येत्या काळात भाऊ की देवाभाऊ यापैकी कोणासोबत जाणार याची उत्सुकता ताणून धरली आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 19 वर्षापूर्वी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. सुरुवातीच्या काळात मनसेला मोठे यशही मिळाले होते. मुंबई, पुणे व नाशिक या महापालिकेच्या पट्ट्यात मोठ्या संख्येने मनसेचे नगरसेवक निवडून आले होते. मात्र, त्यांचा हा करिष्मा मात्र परतच्या काळात फारसा चालला नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांच्या समोरील अडचणीत भरच पडली आहे.
राज ठाकरे यांनी 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेतली. त्यांनी ही निवडणूक न लढता त्यांनी भाजपप्रणित महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. एवढेच नाही तर त्यांनी काही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा देखील घेतल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीत महायुतीला 17 तर महाविकास आघाडीला 31जागी विजय मिळवता आला होता.
त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मनसे स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. त्यासाठी काही जागी मनसेने (MNS) उमेदवार उभे केले होते. त्यांनी चिरंजीव अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातून रिंगणात उतरवले होते. त्यामुळे मुंबईतील काही जागा मनसेला मिळतील असे वाटत होते. मात्र, या निवडणुकीत त्यांना मोठा धक्का सहन करावा लागला अमित ठाकरे यांच्यासह त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले.
आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज ठाकरेंची भूमिका काय असणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. विशेषतः मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे पक्षाची भूमिका मांडतील, असे वाटत होते. मात्र, त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे काहीच भूमिका न मांडता महापालिका निवडणुकीसाठी वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. ती भूमिका आजही त्यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळेच कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे दिसत आहे.
दोन महिन्यापूर्वीच त्यांनी एका युट्युबला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना ठाकरे गटासोबत जाण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित करीत उद्धव ठाकरे यांना टाळी देण्यासाठी हात पुढे केला होता. त्याला उद्धव ठाकरेंनी भाषणातून प्रतिसाद दिला होता.
त्यानंतर राज व उद्धव ठाकरे हे दोन बंधू सुट्टीसाठी परदेशात गेले होते. त्या ठिकाणाहून भारतात परतून महिनाभर लोटला असला तरी शिवसेना ठाकरे गट व मनसेच्या युतीबाबतची चर्चा पुढे सरकली नाही. त्यानंतर मनसे व उद्धव ठाकरेंच्या गटाकडून दोन्ही पक्ष लवकरच एकत्र येणार असल्याचे बॅनरदेखील व्हायरल करण्यात आले होते. मात्र, त्यापुढे काही केल्या या दोन पक्षातील चर्चा गेली नाही.
त्यातच मुंबईतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये गुरुवारी राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली असल्याच्या बातम्या बाहेर आल्या आहेत. या भेटीबाबत गोपनीयता पाळण्यात आल्याने या वेळी दोन नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील बाहेर आला नाही. त्यामुळे राज ठाकरे आगामी काळात होत असलेली महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून नेमकी काय भूमिका घेणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे.
त्यामुळे येत्या काळात राज ठाकरे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत जाऊन भावाची साथ देणार की? महायुतीसोबत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ देणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे सर्वांचेच या निवडणुकीपूर्वीच राज ठाकरे हे महायुतीसोबत जाणे पसंत करणार की उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊन भावाची साथ देणार यावर बरीच राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत.
महायुतीसोबत गेल्यास काय होणार फायदा?
केंद्रात व राज्यात सध्या महायुतीची चर्चा आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवली आहे. महायुतीसोबत युती केल्यास राज ठाकरे यांना आर्थिक आणि संघटनात्मक पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत भाजपचा आपला विशिष्ट मतदार आहे. या मतदारांचा देखील मनसेला फायदा होऊ शकतो.
मराठी माणसाच्या हक्कांसाठी नेहमीच राज ठाकरे यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यासोबत युती केल्यास मराठी मतांचे विभाजन टाळता येईल, ज्यामुळे मनसेला अधिक जागा जिंकण्याची संधी मिळू शकते, असे या मागील समीकरण असू शकते. मात्र, सध्या तरी महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याने याठिकाणी मनसेसाठी फारशी जागा असण्याची शक्यता कमी आहे.
दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर लढली तर एकीकडे भाजपचा फायदा होईल मात्र दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर महायुतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
ठाकरे गटासोबत मनसे गेल्यास काय होईल?
गेल्या दोन महिन्यापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, ही महाराष्ट्राची इच्छा असल्याचे चर्चा जोरात आहे. तर दुसरीकडे एका सर्वेक्षणानुसार, ठाकरे बंधूंची युती झाल्यास त्यांना 52.1 टक्के मतदारांचा पाठिंबा मिळू शकतो. मुंबईत ठाकरे गट आणि मनसे यांचा मराठी मतदारवर्ग मोठा आहे. युतीमुळे मराठी मतांचे विभाजन टाळता येईल. दोन्ही पक्षांना आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकमेकांची गरज आहे.
युतीमुळे दोघांचाही प्रभाव वाढू शकतो. याशिवाय मनसेने युती केल्यास त्यांना काँग्रेसच्या गैर-मराठी मतदारांचाही काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे येत्या काळात काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.