
Dhrashiv News : राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची तीन महिन्यापूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात पुन्हा त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली नाही. त्यानंतर सावंतांमागील वाद काही केल्या पाठ सोडायला तयार नाही. याच वादाच्या पार्श्वभूमीमुळे त्यांना मंत्रीपदावर पाणी सोडावे लागले. आता ही वादाचे मुद्दे त्यांना मंत्रीपद सोडल्यानंतरही अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या अडचणीत वाढच होताना दिसत आहे.
परंडा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार राहुल मोटे यांनी तानाजी सावंत यांच्यावर हायकोर्टात धाव घेत गंभीर आरोप केले आहेत. सावंत यांची आमदारकी रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेत मोटे यांनी केलेल्या गंभीर आरोपांची औरंगाबाद खंडपीठाने दखल घेत आमदार सावंत यांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत राहुल मोटे यांनी आरोप केला आहे की, तानाजी सावंत यांच्याकडून मतदारांना साड्या, भांडी आणि रोख रक्कम वाटण्यात आली होती. या आरोपांच्या पुष्ट्यर्थ काही पुरावे देखील याचिकेसोबत जोडले आहेत. औरंगाबाद खंडपीठात याचिकेत तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मतदारांना आमिष दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सावंत यांनी मतदारांना साड्या, भांडी आणि पैशाचे वाटप केले आहेत. मतदारांना अशा प्रकारे प्रलोभने दाखवणे हे निवडणूक कायद्याचे उल्लंघन मानले जाते आणि याच आधारावर मोटे यांनी सावंत यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.
राहुल मोटे यांनी केलेल्या गंभीर आरोपांची दखल घेत औरंगाबाद खंडपीठाने आमदार तानाजी सावंत यांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे. यासोबतच, या प्रकरणात तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत जे भगिरथ कारखान्याशी संबंधित आहेत, आणि क्रांती महिला उद्योग समूहाच्या अर्चना दराडे यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.
ही नोटीस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहिलेले राहुल मोटे यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेच्या आधारावर बजावण्यात आली आहे. मोटे यांनी आपल्या याचिकेत आरोप केला आहे की, तानाजी सावंत यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रभावित करण्यासाठी आर्थिक आमिषे दाखवली होती. या कथित गैरप्रकारामुळे निवडणुकीच्या निकालावर परिणाम झाल्याचा दावा मोटे यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये तानाजी सावंत हे कॅबिनेट मंत्री होते. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत शिवसेनेचे तानाजी सावंत यांना 1 लाख 3054 मते तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल मोटे यांना 1 लाख 1745 मते मिळाली. अवघ्या 1509 मतांनी सावंत विजयी झाले होते.
दरम्यान, काही दिवसापुर्वीच माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यांत्रिकी साफसफाईच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा प्रकार समोर आला होता. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी जी काम पूर्वी वार्षिक 70 कोटी रुपयांमध्ये होत होती, त्या कामासाठी तानाजी सावंत यांनी 3 हजार 190 कोटी रुपये मर्जीतल्या एका कंपनीला दिल्याचे उघड झाले. त्यामुळे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या समोरील अडचणी वाढल्या होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सफाई रुग्णालयामध्ये सफाई करण्यासाठी 3 हजार 190 कोटी रुपयांच्या दिलेले कंत्राट रद्द केले असले तरी सावंत या निमित्ताने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सावंत यांनी यापूर्वी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करीत अनेकदा वाद अंगावर घेतला आहे. आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत अशा वक्तव्याने ते अडचणीत आले आहेत.
तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर अनेकदा चर्चेत राहिले आहेत. तानाजी सावंत पहिल्यांदा वादात सापडले तेव्हा फडणवीस सरकारच्या शेवटच्या टप्यात ते जलसंधारण मंत्री होते. यादरम्यान कोकणात मुसळधार पाऊस झाल्याने चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली होती. त्या घटनेचं खापर त्यांनी खेकड्यांवर फोडलं होते. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती.
त्यासोबतच एकनाथ शिंदे सरकारमध्ये आरोग्य मंत्री असताना त्यांनी 'निवडणूक लढण्यात आपण हयात घालवली. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसल्यानं मळमळ होते,' असे विधान मंत्री सावंत यांनी केल्यानं महायुतीत ठिणगी पडण्याची वेळ आली होती. मात्र, त्यानंतर सारवासारव करण्यात आली होती.
धाराशिव जिल्ह्यात असताना त्यांनी 'संपूर्ण महाराष्ट्र भिकारी होईल, पण हा तानाजी सावंत कधी होणार नाही', असे वक्तव्य केले होते. नुकत्याच राज्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उद्धव ठाकरे सेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करताना त्यांचा बाप काढत त्यांनी रोष ओढून घेतला होता. त्याशिवाय सावंत हे धाराशिवचे पालकमंत्री असताना स्वतःच्या मतदारसंघात अधिक निधी घेण्यावरूनही वादाचे प्रसंग ओढवले होते. पुण्यात ससून हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर कोण आहे हा हाफकिन त्याच्यावर बंदी घाला, असे आदेश आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना त्यांनीच दिले होते.
त्यातच ताजा असलेला वाद म्हणजे तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज बँकॉकला निघाला होता. त्यावेळी ऋषिराजच्या अपहरणाची फिर्याद देणे, त्यासाठी सरकारच्या यंत्रणेचा वापर करणे, बँकॉकला चालले विमान अर्ध्या रस्त्यातून वळवून घेणे या सर्व प्रकारासाठी केलेला बळाचा वापर चर्चेत आला होता. या त्यांच्या मुलाच्या प्रवासावरून विरोधकांनी टीका केली होती. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. त्यातच आता आमदार सावंत यांच्या निवडीला आव्हान देण्यात आलेल्या याचिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.