
Mumbai News : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मांडला. यावेळी अजित पवारांनी शक्तीपीठ महामार्गासाठी ₹८६,३०० कोटी, वर्सोवा-वांद्रे सी लिंकसाठी ₹ १८,१२० कोटी रुपये मंजूर करीत येत्या काळात महायुतीचे सरकार विकासकामावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासोबतच येत्या काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे येत्या काळात मेट्रो विस्तार करण्यावर भर देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मात्र, राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या काही घोषणा पायाभूत सुविधासाठी महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे येत्या काळात या योजना लवकर पूर्णत्वाला घेऊन जाण्याचे शिवधनुष्य महायुती सरकारला पेलवणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुंबई ते नागपूर शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पार पडल्यानंतर आता सरकारने शक्तीपीठ महामार्गाबाबत मोठी घोषणा केली. नागपूर- गोवा असा असा मार्ग असलेला या महामार्गाचा अहवाल तयार झाला असून ८६ हजार ३०० कोटींचा निधी मंजूर झाला. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी सोमवारी विधानसभेत याबाबत घोषणा केली. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या मार्गाकडे येत्या काळात असणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर झाला. यावेळी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पायाभूत सुविधांसाठी 53 हजार 58 कोटींची तरतूद केली आहे. यावेळी फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचाही उल्लेख केला असून समृद्धी महामार्गाचे 88 टक्के काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यात समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार असून सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता बांधण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2023 पर्यंत 10 लाख वाहनांनी त्यावर प्रवास केला, असंही फडणवीसांनी म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी शक्तीपीठ महामार्गाची घोषणा केली.
वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवीपर्यंत नागपूर गोवा- महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाचा अहवाल तयार होत आहे. तर, 760 किलोमीटर असलेल्या या महामार्गामुळे मराठवाड्यातील अर्थकारणाला चालना मिळणार आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या माहूर, तुळजापूर, अंबेजोगाई ही तीन शक्तीपीठे जोडली जाणार आहेत. त्याचबरोबर औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर देखील जोडले जाणार आहेत. शक्तीपीठ महामार्गामुळं हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग अशा एकूण ११ जिल्ह्यांना लाभ होणार आहे.
वर्सोवा-वांद्रे सी लिंकमुळे होणार वेळेची बचत
वर्सोवा -वांद्रे सी लिंक हा कोस्टल रोड फेज-3 किंवा वेस्टर्न कोस्टल रोडच्या भागातील एक पूल आहे. 17.17 किलोमीटर (10.67 मैल) लांबीचा हा पूल अंधेरीच्या उपनगरातील वर्सोवा, वांद्रे येथील वांद्रे -वरळी सी लिंकला कोस्टल रोडचा भाग म्हणून जोडला जाणार आहे. सी लिंकमुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि मुंबई उपनगरीय रेल्वेच्या वेस्टर्न लाईनवरील गर्दी कमी होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या वर्सोवा-वांद्रे सी लिंकसाठी अर्थसंकल्पात 18 हजार 120 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात हे काम वेगाने सुरु होणार आहे. राज्यातील महायुती सरकाच्या दृष्टीने हे काम महत्वपूर्ण असल्याने त्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
वर्सोवा-वांद्रे सी लिंक हा वर्सोवा ते वांद्रे वरळी सी लिंकला जोडणारा 17.17 किमी लांबीचा पूल आहे. 8-लेनचा हा सी लिंक वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील विस्तीर्ण वाहतूक आणि वेस्टर्न लाईन मुंबई उपनगरीय रेल्वेवरील गर्दी कमी करण्यासाठी डिझाइन केला आहे. हा केबल स्टेड डिझाइन आहे. यामुळे नागरिकांचा मोठा वेळ वाचणार आहे. यापूर्वी 90 मिनिट लागत असलेल्या या मार्गसाठी पूल तयार झाल्यानंतर 15 मिनिट लागणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या वेळेची बचत होणार आहे. त्यामुळे या ड्रीम प्रोजेक्ट्साठी महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.
143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करणार
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मेट्रो संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. बाळकुम ते गायमुख मार्ग 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यासोबतच येत्या काळात मुंबई, पुणे आणि नागपूर येथील मेट्रो प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. मुंबई, नागपूर व पुणे महानगरांतील नागरिकांना पर्यावरणपूरक, शाश्वत, विनाअडथळा व वातानुकुलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सेवेचा लाभ सुमारे 10 लाख प्रवासी रोज घेत आहेत.
येत्या वर्षात मुंबईमध्ये 41.2 किलोमीटर, तर पुण्यामध्ये 23.2 किलोमीटर असे एकूण 64.4 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत. येत्या 5 वर्षांत एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी काळात या शहरात होत असलेल्या महापालिकांच्या निवडणुका लक्षात घेऊन या ठिकाणी मेट्रोच्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. मेट्रो विस्तार करून राज्यातील प्रमुख शहरातील पायाभूत सुविधा वाढविण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.