Mumbai News : महाराष्ट्रात सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवले होते. 288 पैकी 232 जागा जिंकत ही निवडणूक महायुतीने एकतर्फी जिंकली होती तर विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीला या निवडणुकीत केवळ 46 जागा जिंकता आल्या होत्या. त्याचमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका लेखाद्वारे ही निवडणूक फिक्स होती, असा आरोप करीत पाच मुद्दे मांडत निवडणूक आयोगाला घेरले होते. राहुल गांधींच्या या सर्व प्रश्नाचा खुलासा निवडणूक आयोगाने केला आहे. त्यानंतर राहुल गांधींच्या फिक्सिंगच्या आरोपानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे.
जोपर्यंत राहुल गांधी (Rahul Gandhi) जमिनीवर येऊन वस्तुस्थिती समजून घेत नाहीत, लोकांना खोटे बोलत नाहीत आणि स्वतःला आणि त्यांच्या पक्षाला खोट्या आशा देत नाहीत, तोपर्यंत त्यांचा पक्ष कधीही जिंकू शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनी राहुल गांधींनी मांडलेल्या पाचही मुद्द्याची चिरफाड लेख लिहूनच केली आहे. त्यामध्ये फडणवीस यांनी गांधींच्या सर्व प्रश्नाला या लेखातूनच सडेतोड उत्तरे दिली आहेत.
राहुल गांधींनी बिहारमध्ये पराभव स्वीकारला आहे. ते स्वत:च्या पक्षाला खोट्या आशा देत नाहीत, तोपर्यंत त्यांचा पक्ष कधीही जिंकू शकत नाही. त्यांना आता जागे व्हावे लागेल आणि वास्तव समजून घ्यावे लागेल. एकदा पराभव स्वीकारुन आपण कुठे चुकतो आहोत, जनतेशी आपला कनेक्ट कुठे कमी पडतो, त्यासाठी काय केले पाहिजे, याचा विचार केला तर ते अधिक संयुक्तिक ठरेल असा सल्ला फडणवीस (devendra fadnavis) यांनी राहुल गांधींना दिला आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपने "मॅच-फिक्सिंग" केली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यांनी एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखात भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राज्यातील लोकशाही प्रक्रियेत गडबड करण्यासाठी पाच-सूत्री मॉडेलचा वापर केला असल्याचा दावा करीत निवडणूक आयोगाच्या कारभारावरच शंका उपस्थित केली होती. त्याला आता त्याच शब्दांत उत्तर देत फडणवीस यांनी देखील या पंचसुत्रीला मुद्देसूद उत्तर दिले आहे.
मुद्दा पहिला : मुख्य निवडणूक आयुक्त 26 पैकी 25 काँग्रेसने नेमले
1950 पासून नवीन कायदा अस्तित्वात येईपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त तुमच्या काँग्रेस सरकारने थेट नियुक्त केले. आतापर्यंतच्या 26 पैकी 25 आयुक्त तुम्ही केंद्र सरकारकडून थेट नेमले. पहिल्यांदा मोदीजींनी त्यात विरोधी पक्षनेता किंवा सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली. पण, लोकशाहीला भक्कम करणारे आणि तुमच्या काळात कधीही पाळले न गेलेले पाऊल तुम्हाला आवडलेले दिसत नाही, असा टोला फडणवीस यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.
दुसरा टप्पा : मतदारवाढीचा मुद्दाच खोडून काढला
विधानसभा निवडणुकीत 40 लाख 81 हजार 229 मतदारांपैकी 26 लाख 46 हजार 608 मतदार हे युवा मतदार होते. नवीन मतदारांची नोंदणी, त्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचा सहभाग, त्यावरील सुनावणीची पद्धत याबाबत निवडणूक आयोगाने 24 डिसेंबर 2024 रोजी आपल्या पक्षाच्या विधी, मानवाधिकार आणि आरटीआय विभागाचे वकील ओमर हूडा यांना सविस्तर 60 पानांचे पत्र पाठविले आहे, त्यात सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यात केले आहे. ते आपल्यापर्यंत पोहोचले नसेल तर एकदा मागवून आवर्जून वाचावे, असे स्पष्ट उत्तर फडणवीस यांनी दिले.
नवीन मतदारांची आकडेवारी काय?
2014 ते 2019 या काळात : 63 लाख नवीन मतदार
2009 ते 2014 या काळात 75 लाख नवीन मतदार
2004 ते 2009 या काळात 1 कोटी नवीन मतदार
म्हणजे 2024 मध्ये काहीतरी दिव्य घडले, असे अजिबात नाही, असे फडणवीस म्हणाले. त्यांनी लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांदरम्यान किती मतदार वाढले ही आकडेवारी सुद्धा दिली आहे.
2004 : लोकसभेपेक्षा विधानसभेत 5 टक्के अधिक
2009 मध्ये 4 टक्के अधिक
2014 मध्ये 3 टक्के अधिक
2019 मध्ये 1 टक्का अधिक
2024 मध्ये 4 टक्के अधिक आहे. त्यामुळे पुन्हा 2024 मध्ये काहीही नवीन घडले असे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तिसरा टप्पा : अधिक मतदानावरून फडणवीस यांनी टाकला बॉम्ब
दिवसभर झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी पाहिली तर प्रतितास सरासरी 5.83 टक्के इतके मतदान झाल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे शेवटच्या 1 तासात 7.83 टक्के इतकी वाढ झाली आहे, असे सांगून आपण काय नवीन सांगतो आहोत? सायंकाळी 5 ते 6 ही सुद्धा मतदानाची वेळ आहे आणि 6 पर्यंत बुथवर आलेल्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता येतो, ही बाब राहुल गांधी माहिती नाही काय? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांच्या कार्यालयाने एक वृत्तपत्रातील 3 डिसेंबर 2024 रोजी लिहिलेल्या लेखाचा संदर्भ त्यासाठी दिला आहे. 2024 च्या लोकसभेच्या दुसर्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजता दिलेली मतदानाची आकडेवारी 60.96 टक्के इतकी, जी दुसर्या दिवशी 66.71 टक्के इतकी अंतिम झाली. यातील वाढ 5.75 टक्के इतकी पण, ती निवडणूक तुम्ही जिंकलात म्हणून लपवून ठेवणार का? असा बॉम्ब फडणवीस यांनी टाकला.
चौथा टप्पा : कामठीप्रमाणे मतदान वाढलेल्या मतदारसंघात आघाडीही जिंकली
यात राहुल गांधी यांचे म्हणणे आहे की, केवळ 85 मतदारसंघात 12 हजार मतदान केंद्रांवर वाढीव मतदारांची संख्या होती आणि यापैकी बहुतेक जागा एनडीएच्या पारड्यात गेल्या. सायंकाळी 6 नंतर झालेले मतदान हे 17 लाख 70 हजार 867 इतके आहे. दिवसभराच्या मतदानाच्या सरासरीनुसार, 1 लाख 427 मतदान केंद्रावर प्रति मिनिट 97,103.32 इतके मतदान झाले आहे. त्यामुळे जे मतदान सायं. 6 नंतर झाले आहे, त्याची सरासरी काढली तर अतिरिक्त लागलेला वेळ हा केवळ 18 मिनिटे 23 सेकंद इतका आहे, अशी आकडेमोड या लेखात केली आहे.
ज्या मतदारसंघात शेवटच्या क्षणी मतदार टक्केवारीत वाढ झाली तेथे एनडीएच जिंकली, हे तर आणखी हास्यास्पद आहे. कामठीचे उदाहरण त्यांनी दिले. पण जे उदाहरण त्यांनी दिले नाही, ते मी येथे देतो आहे. माढ्यात 18 टक्के वाढ दिसते. जेथे शरद पवार गटाचा उमेदवार जिंकला आहे. वणीत 13 टक्के वाढ आहे, जेथे उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला आहे. श्रीरामपूर येथे 12 टक्के वाढ जेथे काँग्रेस जिंकली आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पाचवा मुद्दा : सातत्याने जनादेशाचा अपमान
काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने लोकशाही प्रक्रियेचा अपमान करतात. सातत्याने जनादेशाचा अपमान करतात. जनतेने राहुल गांधींना नाकारले, त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत. यातून काँग्रेस पक्ष आणखी गर्तेत जाणार, असे फटकारे फडणवीस यांनी लेखातून लगावले. आपल्याच पक्षाचे आमदार राहुल गांधी यांची एक दिवसात भेट घेऊन दाखवा, अशी विधाने का करतात? यावर त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.