

Solapur News: महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीकडे निघालेल्या वारकर्यांसाठी मोठी पर्वणी मानली जाणारी आषाढी एकादशी येत्या 25 जुलैला आहे. या एकादशीच्या निमित्तानं लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल होत असतात. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काही महत्वाचे आदेश दिले आहेत.
सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी पंढरपूर येथील विठ्ठलाच्या व्हीआयपी दर्शनाबाबत महत्त्वाचं भाष्य केलं. त्यांनी मंत्री,आमदार वा खासदार अशा कोणत्याही व्हीआयपी दर्शनबंदी आदेशाचं पालन अत्यंत कठोरपणे करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य भाविकांसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यात राज्यभरातून आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरीत दाखल होणाऱ्या सर्वसामान्य भाविकांच्या लवकरात लवकर दर्शनाला प्राधान्य दिलं आहे.
या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये बुधवार(ता.15 जुलै)पासून व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. मात्र, हा व्हीआयपीच्या दर्शनबंदीचा आदेश काढल्यानंतर पहिल्या दिवशी काही राजकीय नेतेमंडळी पंढरपूरमध्ये दर्शनासाठी आले होते. त्यामुळे थोडा तणाव निर्माण झाल्याचं जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी माहिती दिली.
मात्र,जिल्हाधिकाऱ्यांनी आता यापुढे पंढरपूरमध्ये अतिशय कठोरपणे व्हीआयपी दर्शन बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आषाढी एकादशीचा सोहळा पार पडेपर्यंत सरकारी प्रोटोकॉलचं पालन करताना मंत्री, आमदार, खासदार यांना व्हीआयपी दर्शन घेता येणार आहे. पण त्यांच्यासोबत दोन किंवा तीन लोकांनाच दर्शनासाठी सोडले जाणार आहे.
सरकारमधील मंत्री,खासदार, आमदारांसोबतच्या दोन अथवा तीन लोकांव्यतिरिक्त इतर नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते यांना दर्शनासाठी मंदिरात सोडले जाणार नसल्याचेही जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आपत्कालीन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशाराही त्यांनी सांगितलं आहे.
सोलापूर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी १५ जुलैपासून पंढरपूर येथील विठ्ठलाचं व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे आदेश श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला दिले आहेत. नियमांची कठोरपणे अंमलबजावणी होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली आहे.
याचदरम्यान, माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे पंढरपूरला सहकुटुंब दर्शनाला आले होते. मात्र, व्हीआयपी दर्शन बंद असल्याचं त्यांना सांगण्यात आले. यानंतर त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना संपर्क केला. काही वेळानं त्यांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात आले. त्यानंतरही मुनगंटीवार यांनी मंदिर समितीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती.
तर दुसरीकडे राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील हेही त्यांच्या समर्थकांसह पंढरपूरला आले होते. दर्शनासाठी निघालेल्या पाटलांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाटील यांच्या पाठोपाठ त्यांच्या समर्थकांनीही आदेशाचं उल्लंघन करत मंदिरात घुसून प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं.
यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, आपण लोकप्रतिनिधी आहोत.बारा-बारा तास आणि अडीचशे किलोमीटरवरून प्रवास करून येतो.इच्छा नसली तरी लवकर दर्शनासाठी विनंती करावी लागते. इतरही जबाबदाऱ्या असल्यानं दर्शनाला जाऊ द्यायलाच पाहिजे. मात्र, व्हीआयपी दर्शन बंद ठेवल्याच्या नियमांचं उल्लंघन सरकारी मंत्र्यांनीच केल्यानं टीका केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.