
Solapur, 17 August : माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू तथा शिवसेना नेते शिवाजी सावंत यांनी शनिवारी (ता. 16 ऑगस्ट) पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सोलापुरात भेट घेतली आहे. सावंत यांनी बंद दाराआड पालकमंत्री गोरे यांच्याशी सुमारे पंधरा मिनिटे चर्चा केली, त्यातून सावंतांच्या भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
दरम्यान, माढा तालुक्यातील विकासकामांच्या निधी मागणीच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांची भेट घेतली. या वेळी विविध विषयांवर चर्चा झाल्याचेही शिवाजी सावंत यांनी सांगितले.
सोलापूर शहरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये गोरे आणि शिवाजी सावंत (Shivaji Sawant) यांची भेट झाली आहे. वाडिया हॉस्पिटलच्या एका खोलीत या दोन नेत्यांमध्ये शनिवारी चर्चा झाली आहे. त्यानंतर सावंत यांनी दिलेली प्रतिक्रिया यामुळे सावंत यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे, त्यामुळे सोलापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
शिवसेना पक्षात सोलापूर जिल्ह्यातील निर्णय प्रक्रियेत विचारात घेतले जात नाही. पक्षाच्या संघटनात्मक निवडीबाबत कोणतेही अधिकार न देता परस्पर निवडी केल्या जातात, असा आरोप करून शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी पंधरा दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, संपर्कप्रमुखपदाचा राजीनामा देणाऱ्या सावंत यांची पक्षाच्या वरिष्ठांकडून साधी विचारपूसही करण्यात आली नाही, त्यामुळे चिडलेल्या सावंत समर्थकांनी शनिवारी (ता. 16 ऑगस्ट) माढ्यात एका बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीत सावंत समर्थकांनी पक्ष नेतृत्वाबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या.
या मेळाव्यात शिवसेनेच्या वरिष्ठांसह पक्षात नव्याने आलेल्या मंडळीवर सोलापूरचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, संजय टोणपे, रवीना राठोड, मंगलताई कोल्हे, नवनाथ भजनावळे, मुन्ना साठे, जवाहर जाजू आदींनी जोरदार निशाणा साधला. ज्या पक्षात २५ वर्षांहून अधिक काळ घालवलेला असतानही शिवाजी सावंत यांना पक्षाच्या कामकाजात विश्वासात घेतले जात नसेल तर त्या पक्षात थांबण्याची गरजच नाही. आता शिवसेनेतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. आता आपल्याला भारतीय जनता पक्षात जावे लागेल, अशीही भूमिका या कार्यकर्त्यांनी मांडली.
पक्षाकडून मिळणारी वागणूक स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारी : सावंत
मेळाव्यात प्रा. शिवाजी सावंत म्हणाले, शिवसेनेचे माजी एकनिष्ठतेने काम करीत आलो आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वरिष्ठ मंडळींना शिवसेनेत नव्याने आलेले लोक चुकीची माहिती देत आहेत. तसेच पक्षात कुरघोडीचे सत्र सुरु झाले आहे. माझ्याच माढा तालुक्यात जर मला न विचारता तालुकाप्रमुख, शहरप्रमुख नेमले जात असतील पक्षाकडून मिळणारी वागणूक स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारी आहे. या प्रकाराची आम्ही स्वत: पक्षाकडे तक्रार केली. मात्र, काहीही परिणाम झाला नाही, त्यामुळे संपर्कप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.
संपर्कप्रमुखपदाचा राजीनामा देऊन पंधरा दिवस उलटून गेले आहेत. पण, पक्षाकडून साधी विचारणाही झाली नाही. स्वाभिमान गहाण ठेऊन पक्षात राहण्यात काय अर्थ नाही. कार्यकर्त्यांचे विचार, भावना ध्यानी घेऊन विचाराअंती येत्या दोन दिवसांत राजकीय निर्णय घेण्यात येईल, असे शिवाजी सावंतानी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.