
थोडक्यात बातमी:
ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेची सुरुवात केली; 16 तास चर्चा नियोजित.
अरविंद सावंत यांचा सरकारवर हल्ला : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारवर सुरक्षा चुकांबाबत टीका करत, पहलगाम हल्ल्याचे मुद्दे उपस्थित केले.
मोदी सरकारवर आंतरराष्ट्रीय पातळीवर अपयशाचा आरोप: सावंत यांनी म्हटलं की, ऑपरेशन सिंदूरनंतर भारताला आंतरराष्ट्रीय पाठींबा मिळाला नाही, हे सरकारचं अपयश आहे.
New Delhi News : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी, सोमवारी दुपारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू झाली. सरकारच्या वतीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ही चर्चा सुरू केली. लोकसभेत या विषयावर चर्चेसाठी 16 तासांचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. यावेळी राजनाथ सिंग यांनी ऑपेरेशन सिंदूरविषयी माहिती दिली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी संसदेत 'ऑपरेशन सिंदूर' या विषयावर चर्चेच्या दरम्यान, मोदी सरकारवर जोरदार हल्ले चढवले.
तसेच सरकारला काही संतप्त सवालही विचारले. सावंत यांनी आपल्या भाषणादरम्यान, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि इंदिरा गांधींचं नाव घेत मोदी सरकारच्या 'ऑपरेशन सिंदूर'वरुन सभागृह दणाणून सोडलं.
सावंत म्हणाले, मी जेव्हा काही काळासाठी केंद्रात मंत्री होतो,तेव्हा इलेक्ट्रिक बसच्या उद्घाटनासाठी जम्मू काश्मीर गेलो होतो.त्यावेळी तिथे पन्नास मीटर अंतरावर सशस्त्र जवान,पोलिसही तैनात होते. पण असं काय झालं, मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले असताना पहलगाम हल्ल्यावेळी तिथे जवान,पोलिस दोन्ही नव्हते. तिथे कोणताही जवान,पोलिस राहणार नाहीत, असे कोणी आदेश दिले होते? यापासून या हल्ल्याप्रकरणाची चौकशी सुरू करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
त्यादिवशी पहलगाममध्ये सशस्त्र जवान पोलिस का नव्हते, आणि आमचे इंटेलिजन्स काय करत होते. तेथून पाकिस्तान किती दूर आहे, ते सगळे दहशतवादी नेपाळहून आले होते का? याअगोदरही काही दहशतलवादी हल्ले झालेले आहेत. मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोटात जे आरोपी एकोणीस वर्षे तुरुंगात होते. त्यातील पाच जणांना विशेष न्यायालयानं मृत्यूदंड सुनावली होती. आता त्या सर्व आरोपींची आता मुंबई उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे.
यावरुन दोन प्रश्न उपस्थित होतात, ते म्हणजे जर ते आरोपी नव्हते तर त्यांनी वीस वर्षे तुरुंगात का ठेवलं आणि अजूनही पहलगाममधील हल्ल्यातील आरोपी पकडण्यात आलेले नाही,असंही सावंत यांनी ठणकावलं.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या खासदार अरविंद सावंत यांनी ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीवरूनही मोदी सरकारला खडेबोल सुनावले. ते म्हणाले,ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) पार पडल्यानंतर भारत सरकारने वेगवेगळ्या देशांमध्ये प्रतिनिधी पाठवले. या ऑपरेशनबद्दल सविस्तर माहिती देण्याची जबाबदारी या प्रतिनिधींवर होती.
मात्र, हे प्रतिनिधी ज्या-ज्या देशात गेले त्या कोणत्याही देशाने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आम्ही दहशतवादाविरोधातील मोहिमेत भारतासोबत आहोत, असे सांगितले नाही.पहलगाम हल्ल्यावेळी भारतासोबत कोणीही उभे राहिले नाही, हे मोदींचे अपयश आहे, अशी टीकाही सावंत यांनी केली.
अरविंद सावंत यांनी त्यांच्या आक्रमक भाषणात उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासह माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचंही नाव घेत त्यांनी वेळप्रसंगी घेतलेल्या कणखर भूमिकांचा सभागृहात उल्लेख केला. ते म्हणाले, दहशतवादाविरोधात एक राष्ट्र म्हणून आम्ही सगळे सरकारसोबत कालही होतो,आजही आहोत आता उद्याही सोबत राहणार आहोत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पहलागाम हल्ल्यावेळी आम्हांला स्पष्ट आदेश दिले होते. देशावर दहशतवादी हल्ल्यासारखा बाका प्रसंंग आला असताना राजकारण नको. आत्ता आपण पंतप्रधान मोदींच्या खांद्याला खांदा लावून सरकारसोबत राहायला हवं,अशी कणखर भूमिका घेतली होती अशी आठवणही करुन दिली.
पण ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलावलं नसतानाही पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांनी लाहोरच्या ट्रेनविषयी पाकिस्तानशी चर्चा केली. पण गोड बोलून काही होत नसतं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, पाकिस्तान सापासारखा आहे, त्याला कितीही दूध पाजले तरी ते विषच ओकणार आहे. ते बाळासाहेब ठाकरेंचे शब्द आज खरे ठरले, असेही अरविंद सावंत म्हणाले.ॉ
आम्ही पाकव्याप्त काश्मीर परत घेतल्याशिवाय राहणार नाही, असे सत्ताधारी सांगतात. मग हीच योग्य वेळ होती. तुम्हाला कोणी थांबवले होते. पाकिस्तानातील नऊ तळांवर हल्ला करून फार मोठं काम केलंय, असं समजू नका. लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य द्या. सरकारने सांगितलं की, आम्ही लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. मग त्यांना रोखलं का? असा संतप्त सवालही खासदार सावंत यांनी सभागृहात उपस्थित केला.
संसदेत ऑपरेशन सिंदूरवरुन सुरू असलेल्या चर्चेमध्ये खासदार अरविंद सावंत यांनी तडाखेबंद भाषणात'घुसके मारेंगे' ही भाषा भाजपकडून सातत्याने वापरली जाते. पण अमेरिकेने ओसामा बिन लादेनला जसं मारलं, त्याला खरंतर 'घुसके मारेंगे' म्हणतात असा टोलाही सावंत यांनी मोदी सरकारला लगावला.
प्रश्न: ऑपरेशन सिंदूरवर संसदेत कोण बोलले?
उत्तर: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेची सुरुवात केली.
प्रश्न: अरविंद सावंत यांनी कोणते प्रश्न उपस्थित केले?
उत्तर: पहलगाम हल्ल्यावेळी सुरक्षा यंत्रणा कुठे होत्या, असा सवाल त्यांनी विचारला.
प्रश्न: सावंत यांनी मोदी सरकारवर कोणती टीका केली?
उत्तर: आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला पाठिंबा मिळाला नाही, हे अपयश असल्याचे ते म्हणाले.
प्रश्न: त्यांनी कोणाचे उल्लेख करून सरकारला टोले लगावले?
उत्तर: बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि इंदिरा गांधींचा उल्लेख करत मोदी सरकारवर टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.