
Mumbai News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी न लागल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत. या नाराजीनंतर त्यांनी केलेल्या प्रत्येक वक्तव्यानंतर चर्चा होत आहे.
मंत्रिमंडळात समावेश झाला नसल्याने ते नाराज असल्याचे बोलले जाते. आपल्या भाषणातून आणि बोलण्यातून वेगवेगळ्या उपमा आणि उदाहरणे देताना ते आपल्या नाराजीचा योग्य ठिकाणी संदेश देताना दिसतात. सध्या प्रयागराज मध्ये कुंभमेळा सुरू असताना केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता दिसताच त्यांनी लगेच खुलासा करून आपली बाजू सावरली. 'जीवन चलने का है नाम, चलते रहो सुबह शाम'पासून ते 'वक्त आयेगा, वक्त जायेगा'पर्यंत त्यांनी केलेली विधाने हे राजकीय क्षेत्रात सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत.
सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) राज्यात अर्थमंत्री, वन मंत्री तसेच सांस्कृतिक खात्याचे यापूर्वी मंत्री होते. देवेंद्र फडणवीस यांच्या यापूर्वीच्या मुख्यमंत्रीपदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनीच राज्याचा अर्थसंकल्प मांडला होता. ते भाजपचे प्रदेशाध्यक्षसुद्धा राहिले आहेत. अडीच वर्षांच्या महायुतीच्या कार्यकाळातही ते वनमंत्री व सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते. महायुतीची पुन्हा सत्ता आल्यानंतर पहिल्या यादीतच सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश राहील, अशी अपेक्षा राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना होती.
हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. ज्यांचे मंत्रिमंडळाच्या यादीत नावे आहेत त्यांना फोनवरून कळवण्यात आले. शपथविधीला उपस्थित राहण्याचा निरोप देण्यात आला. यात मुनगंटीवार यांचा समावेश नव्हता. त्यामुळे त्यांनी अधिवेशनात जाणेसुद्धा टाळले होते. त्यानंतर त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचीसुद्धा भेट घेत त्यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले होते.
माझे नाव मंत्रिमंडळाच्या यादीत होते. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी आपली दोन तास चर्चा झाली होती. त्यांनीसुद्धा माझे नाव असल्याचे सांगितले होते, असा दावा त्यांनी केला होता. मात्र, माझे नाव कुठल्या पेनच्या शाईने लिहिले होते जे आपोआप मिटले हे कळायला मार्ग नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी मारला होता. ‘वक्त आयेगा वक्त जायेगा' असे सांगून त्यांनी आपण आशावादी असल्याचे सांगितले होते.
'भाजपचे आपण एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. याच जन्मात नव्हे तर पुढील अनेक जन्मातही आपण भाजपमध्ये असू. राष्ट्रसेवा करण्याची संधी आपल्याला भाजपनेच दिली. त्यामुळे पुढील रणनीती ही भाजपचा आमदार म्हणून जनसेवेची असेल. मंत्री म्हणून आपण यापूर्वीही जनतेचीच कामे करीत होतो. आता आमदार म्हणूनही जनतेची कामे करताना आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही,' असे मुनगंटीवार सांगत असले तरी त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही.
सत्तेचे संगमरवरी 'स्मारक' बांधत असताना मूळ विचारांची 'कबर' विसरू नका, असे म्हणत त्यांनी भाजपमधील काही जणांना टार्गेट केले आहे. ज्याला कुणाला माझे मंत्रिपद काढून घेण्यात आनंद वाटलं असेल त्यांना काही दिवसांनी त्याची खंत वाटेल, असे म्हणत त्यांनी काही ज्येष्ठ नेत्यांना सुनावले आहे. त्यासोबतच ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन लढला त्याला भाजपकडून मंत्रिपद दिले, पण मला दिले नाही, अशा शब्दांत त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना देण्यात आलेल्या मंत्रिपदाबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
त्यातच चंद्रपूर जिल्ह्यात वातावरण बदलावर जागतिक परिषदेत बोलताना मुनगंटीवार यांनी गंगा स्नान केल्याने त्वचा रोग होतो, असे आपल्या भाषणात सांगितले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या कुंभमेळ्याची मोठी तयारी केली आहे. भाजपच्यावतीने कुंभमेळ्याचे चांगलेच ब्रँडिंग केले जात आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याने भाजपचे नेते नाराज होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र हे वक्तव्य वादग्रस्त ठरेल याचा अंदाज आल्याने त्यांनी गंगा स्नान केल्याने काही लोकांना त्वचेचे आजार झाल्याच्या बातम्या आपल्या वाचनात आल्या होत्या. या माहितीच्या आधारावर मी गंगा स्नानावर मत व्यक्त केले. मात्र, माझे वक्तव्य मोडतोड करून काही माध्यमांनी दाखवले, असल्याचे सांगत त्याचे खापर त्यांनी प्रसारमाध्यमांवर फोडले. पाण्याचा दर्जा उत्तम ठेवण्याची जबाबदारी संपूर्ण मानव समाजावर आहे. या अनुषंगाने आपले वक्तव्य केले होते. त्याचा गंगा स्नान आणि कुंभमेळ्यातील शाही स्नानाशी काही संबंध नसल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले होते.
त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी महिनाभरापूर्वी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत सुमारे दीड तास चर्चा केली. नितीन गडकरी हे सुरुवातीपासून आपले मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेतली, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. यावेळी आपण कोणत्याही प्रकारे नाराज नाही. आपण कधीही नाराज असू शकत नाही. अनेक वर्ष आपण विरोधी पक्षांमध्ये होतो. त्यावेळी देखील आपण जनतेच्या हिताची कामे केली. आता आपण मंत्री नसलो तरी आमदार म्हणून जनतेच्या हितासाठी संसदीय आयुधांचा वापर करणार आहे. जनतेच्या सेवेचे व्रत आपण घेतले आहे, ते कायम सुरू राहणार असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले होते, हे विशेष आहे.
दुसरीकडे मंत्रिपद न मिळल्याने मी व्यथित नाही. मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मी गोरगरिबांचे विषय मांडायचो आग्रहपूर्वक मांडायचो आता विधानसभेत मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवर नाराज नाहीत, असे सांगत आहेत. भाजपकडून ते नाराज नसल्याचा दावा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना मोठे पद देणार असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. त्यानंतरही त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही हे पुन्हा उघड झाले आहे.
दरम्यान, मुनगंटीवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना सूचक विधान केले होते. ‘जीवनात काहीक्षण धुकं येत असतं, पण ते धुकं पर्मनंट नसतं’, असं सूचक वक्तव्य मुनगंटीवार यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा अर्थ काय? याबाबत आता अनेकांनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी एका कार्यक्रमावेळी एक जुनी आठवण सांगितली. प्रमोद महाजनांनी १९८९ मध्ये पराभव झालेल्या उमेदवारांची बैठक बोलावली होती. त्यावेळी विनोबा भावेंचा दाखला देत राजकारण सोडण्याचा विचार बोलून दाखवला. हजारो गोड पाण्याच्या नद्या समुद्राला मिळतात, पण समुद्र गोड होत नाही. पण तरीही नद्या वाहायच्या थांबत नाहीत. समुद्राच्या पाण्याचे बाष्पिभवन होऊन गोड पाणी मिळते, असे त्यावेळी प्रमोद महाजन म्हणाले. त्यानंतर मी पुन्हा राजकारणात सक्रिय झालो, अशी आठवण मुनगंटीवार यांनी करून दिली होती.
त्याचबरोबर त्यांच्या मंत्रिपदाबाबत बोलताना त्यांनी पक्षातील विरोधकांवर टीका केली होती. “मला मंत्रिपद का मिळालं नाही याची निश्चित माहिती नाही. पण ज्याला कुणाला माझे मंत्रिपद काढून घेण्यात आनंद वाटला त्याला नंतर खंत वाटेल असं काम करण्यासाठी मी मेहनत घेणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. पक्षाचा मूळ विचार कायम ठेवण्यासाठी काही जणांना बलिदान द्यावे लागते. मलाही तेच करावे लागले, असेही मुनगंटीवार म्हणाले होते. त्यामुळे त्यांचा रोख कोणाकडे असल्याची चर्चा त्या कार्यक्रमानंतर रंगली होती.
'जीवन चलने का है नाम, चलते रहो सुबह शाम'
आमचे नेतृत्व भक्कम आहे. प्रत्येक कार्यकर्त्याची काळजी घेतात. या अगोदर ही कार्यकर्त्यांची त्यांनी काळजी घेतली आहे. आमचा पक्ष माझी योग्य ती काळजी घेईल, असा मला विश्वास आहे. आज आम्ही सत्तेत आहोत मात्र याआधी आम्ही इतके वर्ष विरोधात होतो, तेव्हा सुद्धा आम्ही काम केले आहे. सरते शेवटी 'जीवन चलने का है नाम, चलते रहो सुबह शाम' असे म्हणत मुनगंटीवार यांनी अधिक बोलणे टाळले होते.
सुधीर मुनगंटीवार जरी नाराज नसल्याचे सांगत असले तरी त्यांनी गेल्या महिनाभरात केलेली ही वक्तव्ये पाहिली तर त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. एकीकडे मंत्रीमंडळातून वगळल्यानंतर रवींद्र चव्हाणदेखील नाराज होते. मात्र, त्यांचे काही दिवसातच संघटनेत पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, मुनगंटीवार यांच्या बाबतीत पक्ष पातळीवर अद्याप काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांची नाराजी वाढत चालली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपकडून त्यांची नाराजी कशाप्रकारे दूर केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.