
Mumbai News : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनचा चार दिवसापूर्वीच सूप वाजले. यावेळी समारोपाच्या भाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यासह विरोधकांवर आक्रमकपणे टीका करताना सर्वच उणे-धुणे काढले होते. विशेषता अधिवेशनाचा समारोप होण्यापूर्वीच विधिमंडळाच्या गॅलरीतच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली होती. त्यामुळे या दोन्ही आमदारासोबतच त्यांनी सगळ्याच राजकीय पक्षांचे आमदार, कार्यकर्ते माजलेत, अशी टीका केली होती.
सीएम फडणवीस यांनी हे विधान करून अवघे 48 तासही उलटले नाहीत तर लातूरमध्ये छावा संघटनेचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मारहाण केली. त्यामुळे सर्वच पक्षाकडे मारकुटे राजकारणी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यातच बुधवारी ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शाखाप्रमुखाने तलवारी उपसल्या आहेत. त्यांनी तलवार हातात घेऊन धमकावत असल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा मुद्दा राहिलेला नाही. सीएम फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मते फक्त एखाद्या पक्षापुरते हे मर्यादित नाही, तर सर्वच पक्षांमध्ये ही मानसिकता वाढत चालली आहे. गेल्या काही दिवसातील घटनाक्रम पहिला तर मारकुटेपणा आणि गुंडगिरी वाढली आहे. अनेक ठिकाणी स्थानिक राजकारणी, आमदार, किंवा त्यांचे कार्यकर्ते कायदा हातात घेत आहेत. त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आणि पोलीस यंत्रणांवर दबाव वाढत चालला असून काही राजकारणी अनेकदा पोलीस यंत्रणांवर दबाव आणतात, गुन्हेगारी प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करतात, त्यामुळे हा सर्व प्रकार लोकशाहीसाठी घातक ठरत आहे.
गेल्या काही दिवसापासून पहिले तर विधिमंडळातील कामकाजाचा दर्जा कमालीचा घसरलेला आहे. ‘माजलेल्या आमदारां’मुळे सभागृहाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. संसदीय आयुधांचा परिणामकारक वापर करून सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याची, राज्याच्या वाटचालीला दिशा देणारे कायदे करण्याची जबाबदारी विसरून गुंडाचा आखाडा असे स्वरूप विधिमंडळाला प्राप्त झाले आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता मंत्री, आमदारांना गंभीर चर्चा करण्यात स्वारस्य उरलेले नसून एकमेकांचे हिशोब चुकते करण्याच्या कुरघोडीच्या राजकारण सुरु आहे.
त्यामुळेच राज्यातील चौदा कोटी जनतेला न्याय देण्यात लोकशाहीचा हा प्रमुख स्तंभ कुचकामी ठरत आहे. या जनभावनेला वाट देण्याचे काम कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. येथील रटाळ आणि नीरस चर्चेतून काय निष्पन्न होणार, असा भ्रमनिरास झाल्यामुळे ते मोबाईलमध्ये डोके खुपसून या सर्व प्रकारचा निषेध नोंदवण्यासाठीच रमी खेळत होते.
गेल्या 15 दिवसातील घटनाक्रम पहिला तर एकीकडे विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होते तर दुसरीकडे सभागृहाबाहेर राडा सुरु होता. पावसाळी अधिवेशन गाजले ते सभागृहाबाहेरील घटनेने. सत्तेत असलेल्या भाजप, एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळीने मारहाणीचे वर्तुळ पूर्ण केले.
शिंदेसेनेच्या शाखा प्रमुखानेच उपसल्या तलवारी
त्यातच बुधवारी ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शाखाप्रमुखाने तलवारी उपसल्या आहेत. त्यांनी तलवार हातात घेऊन धमकावत असल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. परिसरात दमदाटी केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात पार्किंगच्या वादातून हा सगळा प्रकार घडला आहे. शिंदेसेनेच्या शाखाप्रमुखाने तलवारी उपसल्याचा हा व्हिडिओ समोर आला आहे. या मारहाणीत एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी आकाश भालेराव आणि सुरज हजारे या दोघांना अटक करण्यात आली आहे. शिंदेंच्या कार्यकर्त्यानेच तलवारी उपसल्याने कायदा सुव्यवस्था आहे का...? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच मंत्रालयाच्या कँटिनमध्ये भातावरील वरण खराब निघाले म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांनी कँटिनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यामुळे या प्रकरणावरून आमदार गायकवाड वादात अडकले. या प्रकरणी त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. मी कारवाईला घाबरत नाही, असे त्यांनी सांगितले असले तरी गायकवाड एका प्रकारे अडचणीत आले.
त्यानंतर विधान भवनाच्या आवारातच जितेंद्र आव्हाड यांच्या सोबतच्या वादानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी विधिमंडळ परिसरातील गॅलरीतच आव्हाडांच्या समर्थकाला मारहाण केली. विशेष म्हणजे यातील आरोपीवर मकोकाची कलम आहे. जिथे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची धुरा सांभाळली जाते, आशा विधीमंडळाच्या परिसरातून याच आरोपीने कायदा सुव्यवस्थेची धिंड काढली. त्यामुळे या सर्व प्रकारानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, जितेंद्र आव्हाड यांनी या सर्व प्रकाराबाबत सभागृहाची माफी मागितली.
अधिवेशन सुरळीत पार पडले त्यानंतर काही होणार नाही असे वाटत होते. मात्र, हा त्रिकोण पूर्ण करण्याची जबाबदारी सत्तेतील अजित पवार यांच्या गटाने अधिवेशनानंतर पार पाडली. लातूरमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकून निषेध केला म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या आंदोलकांना जबर मारहाण केली. या घटनेचे पडसाद संपूर्ण मराठवाड्यात उमटले. या प्रकारानंतर सुरज चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला तर गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
लातूरमधल्या या घटनेनंतर सत्तेतील तीन ही मित्र पक्षांच्या नेत्याच्या मारहाणीचा वर्तुळ पूर्ण झाला आहे. या सर्व प्रकारामुळे सत्ताधारी महायुतीमधील नेत्याविषयी नाराजी व्यक्त केली जात असून या सर्व घटनांनी विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. त्यामुळे येत्या काळात या विरोधात विरोधक आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार आहेत. त्यामुळे लातूरमधील मारहाण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय कारवाई केली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.