Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुका होवून सहा महिन्याचा कालावधी लोटला आहे. त्यानंतरही महाविकास आघाडीला हा पराभव पचवणे कठीण जात असल्याचेच दिसत आहे. त्यातूनच या निवडणुकीचे कवित्व गात वेगवेगळी गणिते मांडली जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे विश्लेषण करताना नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर टीका केली आहे.
भाजपने विजय मिळवण्यासाठी "मॅच-फिक्सिंग" केली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखात भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राज्यातील लोकशाही प्रक्रियेत गडबड करण्यासाठी पाच-सूत्री मॉडेलचा वापर केला असल्याचा दावा करीत निवडणूक आयोगाच्या कारभारावरच शंका उपस्थित केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, त्यानिमित्ताने निवडणूक आयोगाची भूमिका काय होती? हे आरोप केवळ राजकीय स्टंट आहेत का? की यामागे काही ठोस पुरावेही आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे येत्या काळात राहुल गांधींच्या या 5 मुद्द्यांचा खुलासा करता करता भाजपच्या नाकीनऊ येणार आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांच्या लेखातून राज्यातील लोकशाही प्रक्रियेत गडबड करण्यासाठी पाच-सूत्री मॉडेलचाच वापर करीत निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर प्रश्नच उपस्थित केले आहेत. राहूल गांधी यांनी त्यांच्या लेखातून महाराष्ट्रात भाजपने विधानसभा चोरल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्रात भाजप व महायुतीने सरकारी यंत्रणा यांच्यात मॅचफिक्सिंग होती. त्यामुळेच ते निवडणुकीत जिंकून आले. राज्यात अचानक वाढलेली मतदारांची आकडेवारी आणि मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदानाचा वाढलेला सरासरी टक्का यावरही त्यांनी आक्षेप घेतले आहेत.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीसोबतच राहुल गांधी यांनी 2014 तसेच 2009 च्या निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यानंतर सरासरी फक्त तीन टक्केच मतदान वाढल्याची आकडेवारी दिली आहे. 2024 च्या निवडणुकीत निवडणुकीची वेळ संपल्यानंतर तब्बल 8.74 टक्के मतदान वाढले आहे. राहुल गांधी यांनी कामठीचे उदाहरण दिले आहे. त्यात त्यांनी पाच महिन्यात 35 हजार वाढलेले मतदान आले कुठून असे म्हटले आहे. त्याचा खुलासा करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात निवडणूक जिंकण्यासाठी बेईमानी करण्यात आल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक म्हणजे निवडणूक कशी चोरली होती याचे त्यांनी मुद्देनिहाय विश्लेषण केले आहे. पहिला टप्पा निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसाठी पॅनेलमध्ये घोटाळा करणे हा होता. दुसऱ्या टप्प्यात मतदार यादीत बोगस मतदरारांचा समावेश करण्यात आला. तिसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढवली गेली.
चौथ्या टप्प्यात भाजपला (BJP) जिथे जिंकणे अशक्य होते तिथे बनावट मतदान करून घेण्यात आले. तर पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात सगळे पुरावे लपविले गेले, असा दावा राहुल गांधी यांनी केला. त्यासाठी त्यांनी कामठी विधानसभा मतदारसंघाचे उदाहरण दिले आहे. त्यात त्यांनी लोकसभा निवडणुकीत आघाडीवर असलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत कसा धक्का बसला हे सांगितले आहे. त्यामध्ये पाच महिन्यात 35 हजार वाढलेले मतदान आले कुठून असा सवाल उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा हवाला देत त्यांनी अखेरच्या 2 तासांमध्ये लाखोंच्या संख्येने मतदान पडणे भौतिकदृष्ट्या अशक्य असल्याचे म्हटले आहे. एका मतदाराला मतदान करण्यासाठी जवळपास 3 मिनिटे लागतात, त्यामुळे इतक्या कमी वेळात इतकी मते टाकता येत नाहीत. आयोगाचा डेटा पूर्णपणे चुकीचा आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली असून एकमेकांवर पुनः आरोप केले जात आहेत. एकमेकांवर केल्या जात असलेल्या आरोपामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्राची निवडणूक खरंच फिक्स होती का ? हे सांगताना राहुल गांधी यांनी मांडलेल्या या 5 मुद्द्यांचा खुलासा करता करता भाजपला मात्र येत्या काळात घाम फुटणार आहे.
राजकीय पक्ष अनेकदा निवडणुकीनंतर निकाल त्यांना अनुकूल न आल्यास ईव्हीएम हॅकिंग, प्रशासनाचा दुरुपयोग, मतदार यादीतील गोंधळ इत्यादी मुद्द्यांवर शंका उपस्थित करतात. मात्र, निवडणूक आयोग, न्यायालये आणि विविध स्वतंत्र निरीक्षक संस्था यांचे म्हणणे आहे की भारतीय निवडणुका संपूर्ण पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने होतात. मात्र, लोकसभा निवडणुकीतील निकाल व पाच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल यामध्ये खूप अंतर आहे. त्यामुळे विरोधकांना बोलण्याची संधी चालून आली आहे. विशेषता महाराष्ट्रातील विधानसभा चुरशीने पार पडली होती. त्यामुळेच निकाल एवढे एकतर्फी येतील यावर विरोधकांचा अद्याप विश्वासच बसत नाही. त्यामुळेच विरोधकांकडून सातत्याने निवडणूक फिक्स असल्याच्या कारणावरून सत्ताधाऱ्यांना घेरले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.