.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Mahayuti Rift Latest News: विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवले. त्यानंतर राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या-ना त्या कारणावरून मतभेद दिसून येतात. त्यामुळेच सर्व काही आलबेल असूनही सरकार स्थापन करण्यास वेळ लागला होता.
त्याचवेळी महायुतीमधील तीन पक्षातील नाराजीनाट्य पाहवयास मिळाले होते. सुरुवातीला गृहमंत्रीपद व वाट्याच्या मंत्रिपदावरून त्यानंतर मलईदार खात्यावरून, पालकमंत्रीपदावरून, बंगल्याच्या वाटपावरून नाराजी उफाळून आली होती. त्यानंतर आता निधीवाटपावरून मतभेद समोर आले आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा विकासकामे थांबवत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकत्रित येत केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्याची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमधील मित्रपक्ष निवडणूका एकत्रित लढणार की स्वबळावर लढणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यातच आता एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे विकासकामे थांबवत असल्याची तक्रार केल्याने आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
अजित पवार आणि शिवसेनेतील (Shivsena) हा वाद नवा नाही. पाच वर्षापूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजितदादा उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करीत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटानंतर महायुती सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रवेश केला होता. त्यावेळेसपासून शिंदेंच्या शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या वादात नव्याने ठिणगी पडली आहे.
राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक मंगळवारी पार पडली. त्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजित पवार विकासकामे थांबवत असल्याची तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे. महायुती सरकारमध्ये सर्वांना समान अधिकारी मिळावा, अशी भावना देखील व्यक्त केली आहे. त्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी अजित पवारांविरोधात एकनाथ शिंदेंजवळ तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार आमची विकास कामे थांबवत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी शिंदेंकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी बोलून यावर उपाययोजना करणार असल्याचे एकनाथ शिंदें नाराज मंत्र्यांनी यावेळी सांगितले. या निमित्ताने पुन्हा एकदा महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
यावेळी मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांच्या विभागांना कमी निधी दिला जात असल्याची तक्रार यावेळी शिंदेंकडे केली. यापूर्वीही अजित पवारांबद्दलची नाराजी एकनाथ शिंदेंकडे व्यक्त केली होती. महायुती सरकार अंतर्गत कुरघोडीचे राजकारण होत असल्याचे पहायला मिळत असले तरी ते रोखण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय पाऊले उचलतात याकडे लक्ष लागले आहे.
आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील मित्रपक्षाचे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे येत्या काळात हे वाद विकोप्याला जाऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागणार आहे. त्यामुळे या वादावर पडदा टाकण्यासाठी आता फडणवीस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.