Mumbai News : राज्यात येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. ही निवडणूक भाजप स्वबळावर लढणार की एकत्रित निवडणूक लढणार याचा निर्णय होणे बाकी आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपचा दारुण पराभव झाला. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन केले. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला दमदार कामगिरी करावी लागणार आहे.
मंगळवारी आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra chavan) यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली जाणार आहे. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याजागी आता चव्हाणांची वर्णी लागणार आहे. एकेकाळी मंत्रिपदाची धुरा असणाऱ्या रवींद्र चव्हाणांच्या हाती आता पक्षसंघटनेची सूत्र असणार आहेत. येत्या काळात पक्षसंघटनेच्या बळकटीसोबतच युवा कार्यकर्त्यांना घडविण्यासाठी व त्यांना काम करण्यासाठी प्रोत्सहीत करण्याचे नवे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
दोनच दिवसानंतर रवींद्र चव्हाण भाजप (BJP) पक्षाचा कारभार हाकणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या नव्या मंत्रीमंडळात चव्हाणांना स्थान मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी नाराजीव्यक्त केली नाही. पक्षाने दिलेल्या आदेशाचे त्यांनी पालन केले. त्यामुळेच पक्षाने मोठी जबाबदारी टाकत त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. पक्षसंघटनेत मोठे पद देताना चव्हाणांची संयमी भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द पहिली तर त्यांनी डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे सलग चौथ्यांदा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिले. परंतु यंदा त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. दरम्यान, भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आता मंत्री पदाची धुरा सोपविण्यात आल्याने रवींद्र चव्हाणांकडे आता प्रदेशाध्यक्षाची धुरा राहणार आहे.
महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे कार्यकर्त्यांच्या निवडणूका म्हणून पाहिले जाते. त्यामुळे या निवडणुकीत भाजपच्या यशाचा आलेख चढता ठेवण्यासाठी आगामी स्थानिक महापालिका निवडणुकांसाठी त्यांना कंबर कसावी लागणार आहे. याकरिता रणनीती बनवण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे. विशेषतः येत्या काळात मित्रपक्ष असलेल्या महायुतीमधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
मित्रपक्षांशी संवाद साधणे
रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत ठेवण्यासाठी सदैव प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासोबतच मतभेद असतानाही संवाद साधणे. महायुती टिकवून ठेवण्यासाठी संयम ठेवून निर्णय घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवून ठेवणे
येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी भाजपमधील नेतेमंडळींचा व कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी सक्रिय रहावे लागणार आहे. जेव्हा मित्रपक्षांशी संघर्ष होतो, तेव्हा पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यांना मार्गदर्शन देणे गरजेचे असल्याने त्यापद्धतीने काम करावे लागणार आहे.
सार्वजनिक प्रतिमा राखणे
प्रसारमाध्यमांतून कोणतीही आक्रमक प्रतिक्रिया देताना विचारपूर्वक वागावे लागते. त्यासाठी पक्षाने आखून दिलेल्या चाकोरीत काम करण्याचे आव्हान त्यांच्या समोर येत्या काळात असणार आहे. त्यासोबतच येत्या काळात राजकीय संतुलन राखताना विरोधकांवर निशाणा साधताना मित्रपक्षावर अप्रत्यक्ष आघात होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.
रवींद्र चव्हाण हे याआधीच्या सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री होते. ठाण्यातून ते निवडून येतात. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला शह देण्यात त्यांची कामगिरी मोलाची राहिली आहे. विशेषतः त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवत असताना ठाण्यातून येणाऱ्या रविंद्र चव्हाणांकडे प्रदेशाध्यक्षपद देऊन भाजपने मित्रपक्षाला योग्य संदेश दिला आहे.
एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची कामगिरी चव्हाण यांनी अनेकदा केली आहे. येत्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण सहा महानगरपालिका, दोन नगरपरिषदा, दोन नगर पंचायती येतात. त्याचा फायदा येत्या काळात भाजपला होण्याची शक्यता आहे. भाजपने २०२९ साठी शत-प्रतिशतचा नारा दिला आहे. त्याप्रमाणे कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यादृष्टीनं चव्हाण यांच्यासमोर भाजपची पाळेमुळे घट्ट रोवण्याचं आव्हान असणार आहे.
रवींद्र चव्हाण यांची संयमी, संवादात्मक, आणि प्रखर राजकीय समजूत असलेली भूमिका ही आगामी काळात भाजपसाठी निर्णायक ठरू शकते. सत्ताधारी युतीमध्ये नेतृत्वसंघटनेची गरज आहे, आणि ती भूमिका पार पाडताना त्यांची राजकीय परिपक्वता पाहिली जाईल. त्यामुळे येता काळ जरी त्यांची सत्वपरीक्षा घेणारा असली तरी पक्षांनी टाकलेलया मोठया जबाबदारीला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.