Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. या निवडणुकीसाठी महायुती, महाविकास आघाडी एकत्रित की स्वबळावर लढणार याबाबत निर्णय झालेला नाही. तर दुसरीकडे गेल्या तीन महिन्यापासून मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् मनसे नेते राज ठाकरे यांच्या भेटीने ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा थांबल्या होत्या. मात्र, शिवसेनेच्या वर्धापनदिनानंतर पुन्हा एकदा नव्याने मनसे अन् उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्याकडे युतीबाबत विचारणा करीत पदाधिकाऱ्याकडून अहवाल मागवला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यावर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी दोन पावले पुढे टाकली असली तरी मनसेकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. सध्याच्या घडीला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या फक्त चर्चा सुरू आहेत. प्रत्यक्षात कुठलाही प्रस्ताव एकमेकांसमोर कुणीही ठेवलेला नाही. त्यामुळे युती होणार की नाही हा संभ्रम अजूनही कायम आहे.
गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसे युतीची चर्चा सुरु आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. विशेषतः हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, युतीचे "घोडं" अजूनही थांबलेले दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी दोन पावले पुढे टाकली आहेत. मात्र 2014 व 2017 साली युतीबाबत आलेला अनुभव पाहता आता मनसेने ताकही फुंकून पिण्याची भूमिका घेतली आहे.
येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका उद्धव ठाकरे यांची शिवसेना कोणासोबत लढणार यावर आतापर्यंत सस्पेन्स आहे. त्यांच्यापुढे महाविकास आघाडी व मनसे असे दोन पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे. दोन्ही तलवारी एका म्यानात बसने शक्य नसल्याने एकच पर्याय निवडावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेनं विचारपूर्वक चाचपणी सुरु केली आहे.
आगामी काळात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि केडीएमसी या चारही महापालिका निवडणुकांमध्ये सद्यस्थितीत शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या उभ्या फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला डॅमेज कंट्रोल सोबत संघटना आणखी मजबूत करून पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे. त्यांच्यापुढे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मोठे आव्हान आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेला येत्या काळात मुंबईसह उपनगरातील प्रमुख महापालिकांवर पुन्हा सत्ता आणायची असल्यास तर मराठी मतदार एकत्र करण्याची गरज आहे. त्यानंतरच सत्ता मिळवणे शक्य होणार आहे. त्यामुळे जोरात तयारी सुरु आहे.
या चार महानगरपालिकेतील आकडेवारी पहिली तर ठाकरे यांच्या शिवसेनेला फुटीनंतर मोठा फटका बसला आहे. मनसेकडे नगरसेवकांचा आकडा जरी बोटावर मोजण्याइतका असेल तरी पक्षाला उभारी देण्यासाठी आणि आपला मतदार आपल्यासोबत टिकून या महापालिका निवडणुकीत सत्ता आणण्यासाठी समविचारी पक्षाला सोबत घेण्याचा विचार होऊ शकतो. त्यामुळे, ठाकरे बंधु एकत्र आल्यास निवडणूक निकालात वेगळे चित्र दिसू शकते.
सध्याच्या घडीला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या फक्त चर्चा सुरू आहेत. प्रत्यक्षात कुठलाही प्रस्ताव एकमेकांसमोर कुणीही ठेवलेला नाही. त्यामुळे युती होणार की नाही हा संभ्रम अजूनही कायम आहे. युती झालीच तर जिथेजिथे मराठी मतदार मोठ्या संख्येने आहे, तिथे तिथे दोन्ही पक्षांची ताकद जवळपास सारखीच असल्याने जागा वाटपात अडचणीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे.
मराठी मतदार आपल्यासोबत ठेवण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्न करत आहेत. त्यामुळे येत्या काळात जागा वाटपात तडजोड न झाल्यास युतीसाठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे दोन्ही पक्ष चाचपणी करीत आहेत. त्याच धर्तीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या असल्या तरी यावर सर्वसामान्य नागरिकांच्या काय प्रतिक्रिया येणार याची उत्सुकता आहे. सर्वसामान्य नागरिकातून जर या युतीला पोषक प्रतिसाद मिळाला तर भविष्यात दोन्ही सेना एकत्र येऊ शकतात.
राज ठाकरे यांनी गेल्या काही काळापासून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेला शंका आहे की, राज ठाकरे हे भाजपसोबत जास्त जवळीक साधण्याच्या प्रयत्नात आहेत का? त्यामुळे युतीचे घोडे अडले आहे. त्याशिवाय दोन्ही पक्षाच्या विचारधारा आणि कार्यपद्धतीत फरक आहे. दोन्ही पक्षांचा मूळ विचारसरणी मराठी अस्मिता, हिंदुत्व हे सारखे असला तरी त्यांची कार्यशैली, भाषाशैली आणि लोकांशी संवादाची पद्धत वेगळी आहे. उद्धव ठाकरे अधिक संयमित आहेत, तर राज ठाकरे थेट आणि आक्रमक बोलतात. त्यामुळे युती झाली तरी समन्वय साधणं कठीण होऊ शकते. त्यामुळे त्याबाबत अंदाज घेतला जात आहे.
त्याशिवाय महत्वाचा प्रश्न म्हणजे या दोन पक्षाच्या युतीसाठी कोण पुढाकार घेणार, हेही महत्त्वाचे आहे. राजकारणात ‘सामान्य’ चेहरा कोण असेल, प्रचारात कोण प्रमुख भूमिका निभावेल, यावर दोन्ही पक्षांत मतभेद आहेत. त्याशिवाय ‘किंगमेकर’चा रोल कोणाचा? असणार आहे. यावरून दोन्ही पक्षात अद्याप काहीही ठरले नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना अथवा मनसे या पैकी कोण युतीसाठी प्रस्ताव पाठवणार यावरून सध्या तरी घोडे अडलेले आहे. त्यासाठी दोन्हीपक्षाच्या नेत्यात चर्चा होणे आवश्यक आहे बैठका होणे आवश्यक असताना चर्चा अथवा बैठका होताना दिसत नाहीत.
त्यासोबतच सध्या तरी उद्धव ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्याशी चर्चा करून मनसेसोबत युती करण्यासाठी अहवाल मागवून चाचपणी सुरु केली आहे. हा अहवाल येण्यास महिनाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात लवकर तरी या दोन्ही पक्षामध्ये चर्चा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे युतीबाबतच्या चर्चेला महिनाभरानंतर वेग येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.