Shivraj Patil Chakurkar Defeted : पराभव राजकारणातल्या एका दिग्गजाचा

Shivraj Patil Chakurkar Defeted Sarkarnama Podcast : माहेरवाशीणीच्या विजयासाठी उमरगा - लोहारा तालुक्यातील मतदार जणू सज्जच झाले होते
Sarkarnama Podcast :
Sarkarnama Podcast : Sarkarnama

Sarkarnama Podcast : शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसमधलं मोठं नाव….देशाचे गृहमंत्री, लोकसभेचे सभापती अशी पदं भूषवलेला हा नेता…..तब्बल सात वेळा लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या चाकूरकरांना २००४ च्या निवडणुकीत मात्र पराभवाची धूळ चाखावी लागली….ती कशी याची ही कहाणी

माहेरवाशीणीच्या विजयासाठी उमरगा - लोहारा तालुक्यातील मतदार जणू सज्जच झालं होतं..... काँग्रेसच्या विरोधातील तत्कालीन उमरगा-लोहारा विकास आघाडीचे म्हणजेच शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - भाजपचे सर्व नेते मतभेद विसरून कामाला लागले होते. यापूर्वी कधीतरी एकत्र येणारे या आघाडीचे नेते या माहेरवाशीणीच्या विजयासाठी हातात हात घालून उमरगा-लोहारा तालुके पिंजून काढत होते.

२००४ च्या लोकसभा निवडणुकीतील या नेत्यांचे प्रयत्न आणि मतदारांच्या सहानुभूतीमुळे लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार रूपाताई दिलीपराव पाटील - निलंगेकर यांनी ऐतिहासिक असा विजय मिळवला. ऐतिहासिक विजय या अर्थाने की यापूर्वी या मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर सलग सात वेळा विजयी झाले होते. रूपाताई पाटील - निलंगेकर यांचं माहेर धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातील मुळज..... प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला जवळपास ४० हजार मतांची आघाडी देणाऱ्या या मतदारसंघानं २००४ च्या निवडणुकीत रूपाताईंना जवळपास चार हजार मतांची आघाडी दिली होती. त्यामुळे चाकूरकरांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.... त्यांचा ३०,८९१ मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर चाकूरकर राज्यसभेवर जाऊन देशाचे गृहमंत्री झाले. त्यानंतर मात्र मुख्य प्रवाहातील राजकारणातून ते दूर सारले गेले.

Sarkarnama Podcast :
Sarkarnama Podcast : लातूरकरांचा चिमटा, मातब्बराचा पराभव

रूपाताई पाटील यांचं सासर आणि माहेर ही दोन्ही मातब्बर राजकीय घराणी..... मुळज येथील चालुक्य घराणे हे त्यांचं माहेर......चालुक्य घराण्यात चार टर्म आमदारकी होती. (कै.) विजयसिंह चालुक्य हे १९६२ ते ६७ पर्यंत आमदार होते. त्यानंतर (कै.) भास्करराव चालुक्य हे सलग तीनवेळा काँग्रेसकडून निवडून आले होते. हे दोघेही रूपाताई यांचे चुलते. रूपाताईंचे सासर निलंग्याचं निलंगेकर घराणं...... माजी मुख्यमंत्री (कै.) शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या त्या स्नुषा. रूपाताईंचे बंधू (कै.) शिवाजीराव चालुक्य पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील मोठे राजकीय प्रस्थ. ते स्वतः कधी आमदार झाले नाहीत मात्र ते ठरवतील तो उमरग्याचा आमदार होणार, अशी त्यांची ताकद होती. ते मूळचे काँग्रेसचे, मात्र नंतर ते भाजमध्ये दाखल झाले.

तालुक्यात शक्तीशाली असलेल्या काँग्रेसला तोंड देण्यासाठी २००४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच उमरगा-लोहारा विकास आघाडीची स्थापना झाली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत या आघाडीने उमरगा नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यातून हिसकावून घेतली होती. उमरगा तालुक्यात माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ताकद मोठी होती. एकट्यानं कोणत्याही पक्षाला काँग्रेसचा पराभव करणं शक्य नव्हतं...... त्यामुळं मतविभाजन टाळण्यासाठी या आघाडीची स्थापना झाली आणि ते उद्दिष्ट नगरपालिका निवडणुकीत साध्यही झालं होतं......

Sarkarnama Podcast :
Sarkarnama Podcast : धर्माधारित ध्रुवीकरण की जात आधारित ध्रुवीकरण

लोकसभा निवडणुकीतही आघाडीची चलती राहिली. यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत उमरगा विधानसभा मतदारसंघानं शिवराज पाटील चाकूरकर यांना मताधिक्य दिलं होतं. किंबहुना, येथील मताधिक्क्यावरच ते विजयी व्हायचे, मात्र २००४ मध्ये हे चित्र पालटलं. यापूर्वीच्या निवडणुकांत शिवराज पाटील चाकूरकर यांनी जनता दलाचे (कै.) बापूसाहेब काळदाते, राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आदी दिग्गजांच्या या मतदारसंघात पराभव केला होता.

शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव करण्यासाठी पूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले होते. यासाठी पक्षांतर्गत विरोधकही हातभार लावायचे, मात्र काही केल्या त्यांचा पराभव होत नव्हता. लातूर लोकसभा मतदारसंघातील अन्य विधानसभा मतदारसंघांत पिछाडीवर राहिले तरी चाकूरकर यांना उमरगा मतदारसंघ तारून न्यायचा. मुरुम येथील (कै.) माधवराव पाटील, त्यांचे पुत्र बसवराज पाटील यांच्या रूपाने उमरगा-लोहारा तालुक्यांत काँग्रेस मजबूत होती. त्यांच्यामुळे प्रत्येक निवडणुकीत चाकूरकर यांना मताधिक्य मिळायचं..... ही कोंडी फोडणे विरोधकांना शक्य होत नव्हतं......

Sarkarnama Podcast :
Sarkarnama Podcast : अविश्वास ठराव….की प्रचाराचा धुरळा

दरम्यानच्या काळात रूपाताई यांचे पुत्र संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून संभाजी पाटील यांचे नाव पुढे आले होते, मात्र त्यावेळी संभाजी पाटील हे अत्यंत नवखे होते. सलग सातवेळा निवडून आलेल्या चाकूरकरांसमोर त्यांचा निभाव लागणार का, याबाबत साशंकता होती. तसे पाहता ते त्यावेळी राजकारणात चाचपडत होते आणि ते लोकसभेसाठी इच्छुकही नव्हते. त्यामुळे त्यांच्या मातुःश्री रूपाताई यांचे नाव समोर आलं.....संभाजी पाटील यांचा बसत असलेला जम आणि सासर या बाबींमुळे निलंगा रूपाताईंना साथ देणार असं गणित त्यामागं होतं.....

..... दुसरीकडे, उमरगा तालुका हे रूपाताईंचे माहेर. या तालुक्यात (कै.) शिवाजीदादा चालुक्य यांना मानणारा मोठा वर्ग आणि विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमुळे त्यांची ताकद आणखी वाढली होती. शिवसेनेचे माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड (आता शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. सुरेश बिराजदार (आता अजित पवार गट) आणि केशव ऊर्फ बाबा पाटील (आता शिवसेना ठाकरे गट) यांनी रूपाताईंच्या प्रचारासाठी झोकून देऊन काम केलं...... या तिन्ही पक्षांच्या कायर्कर्त्यांची त्यांना मोलाची साथ मिळाली. रूपाताई या माहेरवाशीण असल्याच्या भावनिक मुद्द्यामुळे अर्धे काम झालं होते. याउलट, काँग्रेस काहीशी निश्चिंत राहिला किंवा ग्राऊंडवर काय सुरू आहे, याचा स्थानिक नेत्यांना अंदाज आला नाही. शिवाय, एखादा नेता सलग सात टर्म खासदार राहिल्यानंतर मतदारांमध्ये निर्माण होणारी नाराजी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या वाट्यालाही आली होती.

Sarkarnama Podcast :
Sarkarnama Podcast : आघाड्यांचे राजकारण पुन्हा रंगणार?

चाकूरकर यांच्या बाबतीत तसेही अनेक समज-गैरसमज पसरलेले होते. म्हणजे, ते लोकांची कामे करत नाहीत, लोकांना भेटत नाहीत, एखादे काम घेऊन गेले की, हे काम माझे नाही, माझे काम कायदे तयार करण्याचं आहे, असे ते म्हणतात वगैरे वगैरे......निवडणुकीत आपली सरशी होणार याचा अंदाज आल्यानंतर चाकूरकरांच्या विरोधकांनी या समज-गैरसमजांची पुन्हा चर्चा सुरू केली. ती पद्धतशीरपणे गावागावांत पसरवण्यात आली. संवादाची मर्यादित माध्यमे असतानाही त्या काळात असे समज-गैरसमज वेगाने पसरवले जायचे. हे समज-गैरसमज..... रूपाताईंचे माहेरवाशीण असणे......कुणाची इच्छा असो किंवा नसो नेहमीप्रमाणे होणारे मराठा विरुद्ध लिंगायत हे ध्रुवीकरण आणि विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या नेत्यांमुळे या ध्रुवीकरणाला मिळालेलं बळ आदी कारणांमुळे दरवेळी येथून शिवराज पाटील चाकूरकर यांना मिळणारं ३५ ते ४० हजारांचे मताधिक्य थेट मायनसमध्ये गेले.

रूपाताईंना पाच हजारांच्या घरात मताधिक्य मिळालं.... दरवेळी तारणाऱ्या मतदारसंघानेच चाकूरकरांच्या पराभवात महत्वाची भूमिका बजावली. उमरग्यासह अपेक्षेप्रमाणे निलंग्यानंही रूपाताईंना मोठं मताधिक्य दिलं..... भाजपची खेळी यशस्वी ठरली. स्वच्छ चारित्र्य, अभ्यासू व्यक्तीमत्व आणि भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेल्या चाकूरकरांना पराभवाचे तोंड पाहावं लागलं..... उमरगा मतदारसंघात काय होणार आहे, विकास आघाडीमुळे एकवटलेल्या मराठा नेत्यांमुळे आपली ताकद किती कमी झाली आहे, याचा अंदाज काँग्रेसला आला नाही. त्यामुळे त्यांना यावर उपाययोजना करण्याची गरज भासली नाही.

Sarkarnama Podcast :
Sarkarnama Podcast : संवेदना हरवल्यात?

....शिवाय, रूपाताई पाटील राजकारणात नवख्या होत्या. सलग सातवेळा निवडून आलेत....म्हणजे आठव्या वेळीही चाकूरकरांना कुणी रोखू शकणार नाही, अशा भ्रमातच काँग्रेसचे नेते आणि कायर्कर्ते राहिले. उमरगा-लोहारा विकास आघाडीतील प्रा, रवींद्र गायकवाड यांचा आणि (कै.) शिवाजीदादा चालुक्य यांचाही त्यावेळी जनसंपर्क दांडगा होता. लोकांना ते कधीही, कुठेही भेटायचे. काँग्रेस नेत्यांचे मात्र तसं नव्हतं..... काँग्रेसच्या पारंपरिक मतांवर ते निश्चिंत होते. शिवसेनेच्या उदयानंतर झालेल्या बदलांची सरंजामदारीचा पगडा असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी दखल घेतली नाही. आत जी काँग्रेसची घसरण झालेली दिसते त्याची सुरवात त्यावेळेसपासून झाली होती.

पुढं काँग्रसने चाकूरकरांना राज्यसभेवर घेऊन गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर ते पंजाबचे राज्यपाल झाले आणि मग राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला सारले गेले. २००४ मध्ये चाकूरकर हे पंतप्रधानपदाचे दावेदार होते, असं बोललं जायचं..... मात्र पराभवामुळे ती शक्यता दुरावली. कायकर्त्यांनी दाखवलेल्या फाजील आत्मविश्वासामुळे २००४ मध्ये माझा पराभव झाला, अशी खंत चाकूरकर यांना आपल्या मूळ गावी २०१८ मध्ये आय़ोजित एका कायर्क्रमात व्यक्त केली होती.

लातूर लोकसभा मतदारसंघ २००९ मध्या राखीव झाला. त्यामुळे रूपाताई निवडणूक लढवण्याचा प्रश्नच नव्हता. तत्पूर्वी, २००४ च्या विधानसभा निवडणुकीत रूपाताईंचे पुत्र संभाजी पाटील यांनी आजोबा, माजी मुख्यमंत्री (कै.) शिवाजीराव पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर २००९ मध्ये आजोबांनी नातवाला आस्मान दाखवलं..... त्यानंतर मात्र संभाजी पाटील सलग विजयी होत आले आहेत. त्यांची कॅबिनेटमंत्रीपदीही वर्णी लागली होती. आजोबांसोबत मतभेदांमुळे संभाजी पाटील वेगळ्या पक्षात आहेत. भलेही पक्ष वेगळे असतील, मात्र २००४ नंतर निलंग्याची आमदारकी निलंगेकर घराण्यातच राहिली आहे. तिसऱ्याला संधी मिळेल याची शक्यता त्यामुळे आतापर्यंत तरी संपुष्टात आली आहे.

याच्या नेमके उलट शिवराज पाटील चाकूरकर यांची पुढची पिढी राजकारणात सक्रिय नाही. सध्याच्या परिस्थितीला तरी चाकूरकरांचे राजकारण थांबलेलं आहे. समाजात मान, प्रतिष्ठा आहे म्हणून निवडणुका आल्या की नेते त्यांना भेटायला जातात. एकेकाळी सर्वपक्षीय राष्ट्रीय नेत्यांशी मैत्री असणाऱ्या स्वच्छ चारित्र्याच्या या नेत्याची राजकारणातील भूमिका आता एवढी मर्यादित झालेली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Sarkarnama Podcast :
Sarkarnama Podcast : बंदुकीतून दहशत पसरवणारे हात जलसंधारणाच्या कामात गुंतली अन् गावाचं रूपडं बदललं!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com