
Mumbai News : स्थळ होतं पुण्यातील दिव्यांग मंत्रालयाचे आयुक्त कार्यालय आणि प्रसंग होता विविध मागण्यासाठी मोठ्या संख्यने दाखल झालेल्या अपंग बांधवाच्या आंदोलनाचा. त्याठिकाणी संपूर्ण राज्यभरातून मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव आले होते. कोणाला हात नव्हता तर कोणाला पाय नव्हते. मोठ्या संख्येने अपंग बांधव उपस्थित होते. मात्र, त्यांचे म्हणणे ऐकून न घेताच आयुक्त त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडले होते. कोणाचीही भेट न घेता आयुक्त पायी चालत गाडीकडे निघाले होते.
गाडीत बसून निघणार इतक्यात त्यांच्या गाडीच्या आडवी एक व्यक्ती उभा राहिली. तु यांना का भेटत नाहीस? असा सवाल केला. तुम्हाला भेटण्यासाठी हे दिव्यांग लांबून आले आहेत, असे सांगत आयुक्तांना गाडीतून खाली उतरण्यास भाग पडले. खाली नाही उतरल्यास गाडीची हवा सोडण्याचा दमच भरला.त्यानंतर आयुक्त गाडीखाली उतरले. त्यानंतर त्यांनी दिव्यांगांचे म्हणने ऐकून घेतले. जवळपास एक तास ते त्याठिकाणी थांबले. सर्वांची भेट घेतली आणि बोलले.
आयुक्ताची गाडी अडवण्याचे धाडस करणारा दुसरे-तिसरे कोण नव्हते, तर गेल्या कित्येक वर्षांपासून अपंगाच्या प्रश्नावर रान पेटविणारे प्रहार संघटनेचे अध्यक्ष व राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) होते.
कडू यांची कायमच सर्वसामान्यांसाठी काम करण्याच्या पद्धत राहिली आहे. वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी राज्यातील अपंगांना, गरीब शेतकऱ्यांना आवाज मिळवून दिला, त्यांना नवीन ओळख मिळवून दिली. आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचे अफलातून कसब त्यांच्या अंगी आहे. मधल्या काळात त्यांच्यावर काही आरोप झाले तरीही त्यांची लोकप्रियता थोडीशीही ढळली नाही. चार टर्म आमदार व महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात ते राज्यमंत्री होते.
बच्चू कडू यांची ओळख आज विदर्भातल्या सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे एक प्रखर लोकनेते म्हणून झाली आहे. त्यांनी प्रस्थापित राजकीय चौकटीबाहेर जाऊन काम केले आहे, त्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. कडू यांची राजकीय कारकीर्द ही संघर्ष, जनसंपर्क आणि जिद्दीची प्रेरणादायक कहाणी आहे. त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणात "लोकांच्या कामासाठी थेट रस्त्यावर उतरणारा, झपाटलेला आणि लोकाभिमुख नेता" म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
शेतमजुराचा मुलगा मात्र स्वप्न होते मोठे
अमरावती जिल्ह्यातील बेलोरा येथील एका शेतकरी कुटुंबात 5 जुलै 1970 ला त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती बेताची होती. लहानपणी वीज नसलेली रात्र, उन्हात चालत शाळेचा प्रवास आणि पोटात अन्न नसलं तरी मनात चळवळ असलेली ती उर्मी हेच त्यांच्या आयुष्याचं बीज होते. त्यांचे पूर्वज अमरावतीजवळच्या वाईकी गावातील होते. बच्चुभाऊंचे आजोबा म्हशी खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचे, त्यांचा दुधाचाही व्यवसाय होता. त्यामुळे समाजसेवेचे बाळकडू त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या कुटुंबाकडूनच मिळाले.
आंदोलन ठरले चर्चेचे
बच्चू कडू यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी विविध सामाजिक आंदोलनांद्वारे आपली ओळख निर्माण केली. अपंग व दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी अनेकदा आंदोलनं केली. अपंगांच्या अधिकारांसाठी केलेलं त्यांचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचे ठरले. अपंग व्यक्तींसाठी रस्त्यावर उतरलेले मोर्चे, शेतकऱ्यांसाठी तहसील समोर साखळी आंदोलन, आणि गोरगरिबांसाठी थेट झुंज देणे ही त्यांची खरी ओळख होती. त्यांनी कुठल्याही नेत्याच्या छत्रछायेत न राहता स्वतःची स्वतंत्र लढाई उभी केली.
गाड्या विकून खरेदी केल्या रुग्णवाहिका
रुग्णसेवा हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी आपल्या गाड्या विकून त्यातून रुग्णवाहिका खरेदी केल्या. त्यांच्या प्रहार संघटनेच्या रुग्णसेवा समितीच्या दरमहा विदर्भातून रुग्णांना मुंबईला उपचारासाठी नेण्याचे काम केले जाते. मुख्यमंत्री सहायता निधीतून राज्यभरातील गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी ते दक्ष असतात. स्वतः त्यांनी रक्तदानाचे शतक पार केले आहे.
पहिले आंदोलन
2004 साली पहिले आंदोलन संत तुकाराम महाराजांच्या देहू या गावी घेतले. 'जे का रंजले गांजले त्यास म्हणे जो आपुले' म्हणत आंदोलनाला सुरुवात केली. 15 ते 20 वर्षाच्या कालखंडात जवळपास 182 शासन निर्णय आपण राज्य सरकारला काढण्यास भाग पाडले. सर्वात मोठी उपलब्धी देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय याठिकाणी निर्माण केले. सुरु केलेले आंदोलन ज्या की 30 ते 35 मागण्या होत्या. आता त्या पाच ते सहा मागण्या राहिल्या आहेत.
राजकारणाची सुरुवात
बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने भारावून गेलेल्या बच्चू कडू यांनी राजकारणात प्रवेश केला. बच्चुभाऊंनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात गावातील ग्रामपंचायत निवडणुकीपासून केली. पहिल्यांदा ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. घरून मिळालेला सामाजिक कार्याचा वारसा आणि राजकीय ताकद या माध्यमातून त्यांनी समाजहिताची अनेक कामे केली. आपल्या गावासोबतच ते शेजारच्या गावातील लोकांच्याही समस्याही सोडवू लागले. दरम्यान चांदूरबाजार पंचायत समिती निवडणुकीतही बच्चू कडू निवडून आले अन् थेट सभापती पदावर काम करण्याची त्यांना संधी मिळाली.
शिवसेना सोडून प्रहार संघटनेची उभारणी
चांदूरबाजार पंचायत समितीचे सभापती असताना त शौचालय योजनेतील एक मोठा भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस आणल्याने राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरु झाले होते. अपंग बांधवांसाठीच्या सायकलींच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाबाबत कुरघोडीचे राजकारण झाले. त्यानंतर स्थानिक नेत्यांशी मतभेद झाल्याने त्याकाळी शिवसेना सोडली. अपंग, रुग्ण, विधवा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी त्यांनी प्रहार संघटना काढली.
पहिल्या विधानसभा निवडणुकीत स्वीकारला होता पराभव
1999 साली विधानसभा निवडणुकीत अचलपूर मतदारसंघातून त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला. लोकसभा निवडणुकीतही ते थोडक्यात पराभूत झाले. त्यानंतर पाच वर्षे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले, आंदोलने केली. त्या जोरावर 2004 च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू प्रचंड मतांनी विजयी झाले. परंतु आपली संघटना राजकारणासाठी नसून समाजकारणाची आहे असा आदेश त्यांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना दिला.
लोकवर्गणीतून लढवली होती निवडणूक
2004 च्या विधानसभा निवडणुकीत लोकवर्गणीतून निवडणूक लढवणारे दोन आमदार निवडून आले होते. त्यामध्ये राजू शेट्टी, बच्चू कडू यांचा समावेश होता. हे दोघेही चळवळीतून निवडून आलेले नेते होते. कडू यांनी त्याकाळी आपल्या एकाएकी आवाजाने विधानसभा गाजवून सोडली होती. बच्चू कडू यांनी नागपूर अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पाण्यावरच्या टाकीवर चढून केलेल शोलेस्टाईल आंदोलन आजही अनेकांना स्मरणात आहे.
सलग चार वेळा अपक्ष आमदार ते मंत्री
2004 नंतर 2009, 2014 आणि 2019 असे सलग चार वेळा अपक्ष आमदार म्हणून ते निवडून आले. २०१९ साली लोकसभा निवडणुकीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला उमेदवारी देऊन त्यांनी या गंभीर विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली.
आसूड यात्रा गाजली
एप्रिल 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गावावरून म्हणजे नागपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावापर्यंत म्हणजेच गुजरातमधील वडनगरपर्यंत काढलेली "आसूड यात्रा" खूप गाजली. गुजरातच्या सीमेवर ही यात्रा अडवण्यात आल्यानंतर बच्चुभाऊंनी वेषांतर करून गुजरातमध्ये प्रवेश मिळवला. मोदींच्या वडनगर या गावी जाऊन त्यांनी रक्तदान केले आणि सरकारला संदेश दिला की या देशातील शेतकऱ्यांचे रक्त घ्या, पण त्यांचा जीव घेऊ नका.
ऑफर सोडून प्रतिमा जपली
बच्चू कडू यांना एकदा आर. आर. पाटील म्हणाले होते की, 'राष्ट्रवादीत या, तुम्हाला मंत्री करतो आणि माझ्या पक्षाकडून तिकीट देतो. नाही तर आमच्या पक्षाच्या पाठिंब्याने उभा राहा.' त्यानंतरही ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांना या राजकीय पक्षाचा गुलाम व्हायचे नव्हते. एकवेळ मी जनतेचा गुलाम राहीन पण पक्षाचा गुलाम राहणे रक्तात नसल्याचे त्यांनी स्पष्ट करीत स्वत:ची स्वतंत्र अशी प्रतिमा जपली.
अभिनव आंदोलने
कापसाची बिले द्यायला राज्य सरकार उशीर करत असल्याच्या निषेधार्थ त्यांनी "सामूहिक मुंडन" आंदोलन केले, परिणामी शेतकऱ्यांना त्वरित कापसाची बिले देण्याचे आदेश देण्यात आले होते. दारु बंद व्हावी म्हणून दारूच्या दुकानांसमोर "दूध वाटप आंदोलन" केले. बच्चुभाऊंची छप्परबंद आंदोलन, मंत्र्यांच्या वाहनांवर काळ्या रंगाचे पट्टे मारण्याचे आंदोलन, अचलपूर जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी अन्न त्याग आंदोलन, संडास योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या पंचायतराज समितीला सडलेले संडासच्या भांडे भेट देण्याचे आंदोलन, शाळकरी जीवनातील सुतळी बॉम्ब आंदोलन, मंत्र्याच्या घरी जाऊन त्याचे कान पकडून च्यावम्याव आंदोलन, राज्यातील मंत्र्यांचे मुखवटे लावून आंदोलन, इत्यादी विविध अभिनव आंदोलने केली.
मंत्री झाल्यानंतरही लोकांच्या दारात जाणं सोडलं नाही
2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद मिळालं. जलसंपदा, मत्स्य व्यवसाय आणि अपंग कल्याण या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. पण मंत्री झाल्यानंतरही त्यांनी गाडीतून उतरून थेट लोकांच्या दारात जाणं सोडलं नाही.
थेट भाष्य करणारा, भिडणारा नेता
बच्चू कडू यांची शैली आगळीवेगळी आहे. सभागृहात असो की रस्त्यावर, ते स्पष्ट बोलतात, थेट प्रश्न विचारतात. यामुळे अनेकदा ते वादातही सापडले, पण त्यांच्यावर जनतेचा विश्वास कायम राहिला. कारण लोकांना माहित आहे. हा नेता आपल्यासाठी भांडतोय, ही प्रतिमा मात्र त्यांनी जपली आहे.
महायुती सोडून पुन्हा उतरले रस्त्यावर
विधानसभा निवडणुकी आधी त्यांनी छत्रपती संभाजीनगरला मोर्चा काढला. आता नुकतेच त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून उपोषण केले. या उपोषणाची दखल महायुती सरकारला घ्यावी लागली. तर दुसरीकडे आता त्यांनी कर्जमाफीच्या प्रश्नावरून लक्ष वेधण्यासाठी 'सातबारा कोरा' यात्रा सुरु केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.