
Mumbai, 05 August : महायुतीला सत्तेवर येऊन दहा महिने होत आले तरी रायगडच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत आग्रही आहेत. मागील प्रजासत्ताक आणि महाराष्ट्र दिनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. मात्र येत्या स्वातंत्र्यदिनी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांना ध्वजवंदनाची संधी मिळावी, यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिष्टाई करणार आहेत, त्यामुळे सामंतांच्या शिष्टाईला तरी यश येणार का, हे पाहावे लागणार आहे.
महायुती सरकारच्या शपथविधीनंतर पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून महायुतीमध्ये मोठे रामायण घडले होते. रायगड (Raigad) आणि नाशिकचे पालकमंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेकडून थयथयाट करण्यात आला होता. विशेषतः रायगडमध्ये तर महामार्ग रोखून धरत जाळपोळ करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली होती.
रायगडमध्ये सर्वाधिक आमदार असल्याने शिवसेनेला पालकमंत्रिपद मिळावे, यासाठी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) तीव्र इच्छुक आहेत. गोगावलेंसाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अंगावर घेतले आहे. महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांनी पालकमंत्रिपदासाठी मागील काळात टोकाची भूमिका घेतली होती.
दरम्यान, रायगडचे पालकमंत्रिपद हे शिवसेनेला मिळावे, यासाठी आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. एक शिवसैनिक म्हणून आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजेत, अशी माझी इच्छा आहे. भरत गोगावले यांना येत्या स्वातंत्र्य दिनी ध्वजवंदन करण्याची संधी मिळावी, अशी आमची आग्रहाची मागणी राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत उदय सामंत यांचं म्हणणं योग्यच आहे. आपल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्या माणसाच्या हातून ध्वजावंदन व्हावे, असे वाटत असते. त्यामुळे उदय सामंत यांची मागणी बरोबर बाहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत निर्णय आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याने त्यांच्यावर जबाबदरी आहे, त्यामुळे ते योग्यरितीने पार पाडतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे भरत गोगावले यांनी स्पष्ट केले.
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या पंधरा ऑगस्टच्या अगोदर पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवला जाईल, असं वाटतं. आम्हाला संघर्षाशिवाय कोणतं महत्वाचं पद मिळालेला नाही, त्यामुळे पालकमंत्रिपदासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत असावा, असेही गोगावले यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.