Marathwada Politics News : एक खासदार, सहा आमदार अशी भक्कम स्थिती असताना छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कच खाल्ली. आधी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शस्त्र टाकली आणि आता तोच पाढा विषय समिती सभापती निवडणुकीतही गिरवला.
शिंदेंच्या शिवसेनेचे 21 सदस्य, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नऊ, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रत्येकी एक आणि एक अपक्ष असे 33 सदस्यांचे संख्याबळ हाती असताना शिंदेंच्या शिवसेनेने माती का खाल्ली? असा संतप्त सवाल शिवसैनिक आता विचारू लागले आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते शहर, ज्या शहरावर गेली 20-25 वर्ष कायम शिवसेनेचा प्रभाव राहिला, त्याच छत्रपती संभाजीनगरच्या बालेकिल्ल्यात हतबल होण्याची नामुष्की नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे ओढावली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वैयक्तिक स्वार्थ, सगळी पद घरातच हवी हा अट्टाहास आणि अशा नेत्यांवर नसलेला अंकुश यामुळे भाजपला आपली शतप्रतिशत सत्ता स्थापन करण्यात कुठलीच अडचण आली नाही.
आतापर्यंत जे भाजपचे स्थानिक नेते शिवसेनेच्या मागे-पुढे फिरायचे तेच नेते आज शिंदेंच्या शिवसेनेवर गुरगुरतायेत. महापालिका निवडणुकीच्या आधी 'ना बाण'चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला सूचक संदेश स्थानिक नेत्यांनी आपल्या अचूक रणनीतीने खरा करून दाखवला. महापालिकेत उपमहापौर पदावर बोळवण झाल्यानंतर जिल्हा परिषदेत भाजपने मित्रपक्ष शिवसेनेला थेट विरोधी पक्षातच बसवले.
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, शहरातील आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हा परिषदेच्या राजकारणाला कलाटणी देण्याची ताकद असलेले अब्दुल सत्तार, जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे, त्यांचे पुत्र विलास भुमरे, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, कन्नडच्या संजना जाधव असे एकापेक्षा एक सरस नेते, लोकप्रतिनिधी असताना भाजपच्या सावे-बंब-चव्हाण या त्रिकुटाने त्यांच्यावर मात केली.
भाजपच्या नेत्यांच्या आपल्या सदस्यांवर असलेला अंकुश या सगळ्या घडामोडीत महत्वाचा मानला गेला. तर दुसरीकडे नेमकं या विरुद्ध वातावरण होते. नेत्यांनी एकमेकांची जिरवण्यासाठी पक्षाची वाट लावली. बहिष्काराच्या नावाखाली शिवसेनेने केलेला पळपुटेपणा शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला आहे. दोन्ही शिवसेनेच्या बोटचेपेपणामुळे छत्रपती संभाजीनगरवरचा भगवा खाली उतरल्याची टीका आता होऊ लागली आहे.
ठाकरेंच्या पक्षाला सौदेबाजीचे ग्रहण..
शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपासमोर लोटांगण घातले, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी भाजपला मदत व्हावी म्हणून कोणालाही मतदान न करण्याचा व्हिप दुसर्यांदा काढला. यावरून त्यांच्याच पक्षाच्या संजय निकम, कृष्णा पाटील डोणगावंकर या सदस्यांनी नेते अंबादास दानवे यांच्यावर सौदेबाजीचा गंभीर आरोप केला.
महापालिकेत सहा नगरसेवक आणि जिल्हा परिषदेत 9 सदस्य एवढीच ताकद राहिलेल्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाचीही भाजपने बिकट अवस्था केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार, खासदार असलेली शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासारख्या विरोधकाला नामोहरम करत भाजपने शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला नुसता हादराच दिला नाही, तर या किल्ल्याचे किल्लेदारच ते झाले, असे चित्र सध्या जिल्ह्यात आहे. यावर शिवसेनेचे मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 'उबाठा'चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय मार्ग काढतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.