
Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवत महाविकास आघाडीला चारी मुंडया चीत केले. त्यानंतर राज्यात 5 डिसेंबरला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली.
त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. मात्र, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करीत असताना महायुतीमधील घटक पक्षाने जवळपास डझनभर मंत्र्यांच्या हातात नारळ दिले. त्यावेळेसपासून महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला नाराजीचे ग्रहण लागले आहे.
महायुती सरकारमध्ये गेल्या अडीच वर्षाच्या काळात राज्याचे आरोग्यमंत्री असलेल्या तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यापासून गेल्या दीड महिन्याच्या काळात त्यांची नाराजी दूर झालेली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सर्व काही आलबेल आहे असे चित्र पहावयास मिळत नाही.
त्यातच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री ठाण्यातील मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर त्यांनी प्रजाकसत्ताक दिनाच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यात हजेरी लावत काही निर्णय घेतले. त्याच वेळी दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेतील गटबाजी मात्र या निमित्ताने चव्हाट्यावर आले आहे.
माजी मंत्री तानाजी सावंत यांनी सर्वच कार्यक्रमाला दांडी मारत नाराज असल्याचे दाखवून दिले तर त्यांचा गट या निमित्ताने दूर झालेला दिसला तर दुसरीकडे तानाजी सावंत यांचे जिल्ह्यातील विरोधक संधी मिळाल्याचे लक्षात येताच पुन्हा सक्रिय झाले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात प्रथमच येत असलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या स्वागताचे बॅनर मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते. या बॅनरवरून काही जणांनी संधी साधत माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बॅनरवरून फोटो हटवला तर काही जणांनी त्यांचा छोटा फोटो वापरत राजकारण करण्याची संधी साधली आहे. त्यामुळे गटबाजी समोर आली आहे.
गेल्या अडीच वर्षाच्या काळात तानाजी सावंत यांनी पालकमंत्री असताना नेहमीच कुरघोडीचे राजकारण केले होते. त्यांनी स्वतःच्या पक्षासोबतच महायुतीमधील घटक पक्षातील काही नेत्यावर नेहमीच कुरघोडी करण्यात धन्यता मानली. त्यांनी महायुतीमध्ये स्वतःच्या पक्षात वेगळा गट निर्माण करीत खतपाणी घातले. त्यामुळे त्यांनी स्वतःहूनच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विरोधक निर्माण केले. त्याचा फटका त्यांना सहन करावा लागत आहे.
2019 साली राज्यात महविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना सुरुवातीच्या अडीच वर्षात मंत्रिपद मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी सुरुवातीच्या अडीच वर्षात मतदारसंघ व जिल्ह्यातील राजकाराणापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली होती. त्याचवेळी त्यांचे विरोधक सक्रिय झाले होते.
त्यावेळेसचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांना हाताशी धरून त्यांच्या विरोधकांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचे काम केले होते. त्यांनतर शिवसेनेतच बंड झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून तानाजी सावंत यांचा पुन्हा दबदबा वाढला होता. त्यांनी पालकमंत्री असताना अनेक निर्णय घेत पक्षांतर्गत विरोधकांवर मात केली होती.
त्यानंतर झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ही त्यांना म्हणावी तशी कामगिरी करता न आल्याने सावंत यांच्यावर महायुतीमधील वरिष्ठ नेते नाराज होते. त्यातच सावंत यांनी मंत्रीपदी असताना केलेले काही विधाने त्यांच्या अंगलट आली आहेत.
धाराशिव जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेचे दोन आमदार होते तर भाजपचा एक आमदार असताना लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार तीन लाख ३० हजार मताने पराभूत झाला. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेचे तीन टर्म आमदार असलेल्या ज्ञानराज चोगुले यांना पराभव स्वीकारावा लागला तर स्वतः सावंत यांना विजय मिळवताना शेवटच्या फेरीपर्यंत झुंजावे लागले होते. त्यामुळेच त्यांना महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांनी मंत्रिपदाची संधी दिली नाही.
मंत्रिपद मिळाले नसल्याने सावंत नाराज झाले आहेत. गेल्या काही दिवसापासून नाराज असलेले सावंत पक्षाच्या कुठल्याच कार्यक्रमाला हजेरी लावत नाहीत. दुसरीकडे मतदारसंघात जात नसल्याची चर्चा आहे. नागपूर अधिवेशनातून त्यांनी काढत पाय घेतला होता. त्यानंतर शिवसेनेच्या संघटनात्मक कार्यक्रम व नुकताच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित झालेल्या कार्यक्रमास त्यांनी दांडी मारली होती.
त्यानंतर रविवारी धाराशिवमध्ये नवे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीला शिंदे सेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार तानाजी सावंत यांनी दांडी मारली. त्यामुळे सरनाईक यांनी सावंत यांना खडेबोल सुनावले आहेत.
राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही, ती बदलत असते. या खुर्चीची नेहमीच आदलाबदल होत असते. असे सांगत त्यांनी यावेळी योग्य संदेश देण्याचा प्रयत्न केला. सरनाईक यांनी पहिल्याच जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री म्हणून यांनी मोठे निर्णय घेतले. त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यात पाऊल ठेवताच त्यांनी शनिवारी धाराशिव जिल्ह्यासाठी नवीन ५० लालपरी देण्याची घोषणा केली.
सरनाईक यांनी पहिल्याच डीपीडीसी बैठकीत तुळजापुरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. धाराशिव जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे विशेष लक्ष देणार असल्याचंही यावेळी सरनाईक यांनी स्पष्ट करीत सावंत यांना वेगळाच संदेश दिला. दरम्यान, माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यात पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी पहिला निर्णय आरोग्य विभागाशी संबंधित घेतल्याने या निर्णयाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दुसरीकडे पालकमंत्री सरनाईक यांनी येत्या काळात पालकमंत्री सरनाईक यांनी येत्या काळात धाराशिव जिल्ह्याचा कारभार पाहत असताना सत्ताधारी व विरोधकांना सोबत घेणार असल्याचे स्पष्ट केले. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटलांना सोबत घेऊन झेंडावंदन केले. त्यामुळे सरनाईक यांनी सावंत यांच्या विरोधकांना एकत्र करीत कारभार पाहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यातच सरनाईक यांनी भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील, शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांना सोबत घेत सत्ताधारी व विरोधकांची एकत्रित मूठ बांधली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात सध्या तरी तानाजी तानाजी सावंत एकाकी पडल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.