
Mumbai News : राज्यात आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे महायुतीने एकत्रित निवडणूक लढण्याची घोषणा केली असली तरी भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसापासून धुसफूस वाढली आहे. स्थानिक निवडणुकीसाठी आता हेच मित्रपक्ष समोरासमोर उभे राहणार असल्याने या तीन पक्षातील मतभेद समोर आले आहेत. त्यामुळे यावर येत्या काळात तोडगा न निघाल्यास राज्यातील सत्तेचे वाटेकरी असलेले हे मित्रपक्षाच एकमेकांना भिडणार असल्याचे दिसत आहे.
महायुतीमधील तीन ही मित्रपक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठका घेऊन चाचपणी सुरु केली आहे. त्यातच गेल्या काही दिवसात ठाणे, नवी मुंबईसह 18 ठिकाणी महायुतीमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येत्या काळात याठिकाणी भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस पहावयास मिळणार आहे.
येत्या काळात जिल्हानिहाय बैठका होणार आहेत. त्यामधून आलेल्या अहवालानंतर महायुती संदर्भात निर्णय होणार आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणाचा अहवाल महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे येत्या काळात महायुतीबाबत काय निर्णय होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विशेषता ठाणे-नवी मुंबईसह 18 ठिकाणी महायुतीत धुसफूस असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाणे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असताना याठिकाणी मंत्री गणेश नाईक आणि संजय केळकर यांनी परस्पर स्वबळाचा नारा देत शिंदेंना डिवचले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेवर गणेश नाईक यांचे वर्चस्व आहे. मात्र शिंदेबाबत केलेल्या वक्तव्यावरून नवी मुंबईत भाजप विरूद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे संबध टोकाचे ताणले गेल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्र तयारी सुरू केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर भाजप आणि शिवसेनतील संबध टोकाचे ताणले गेलेत. याठिकाणी भाजपकडून स्वबळाचा नारा दिला जात असल्याने येथेही युतीची शक्यता धुसर आहे.
मिरा भाईंदर या महानगरपालिकेवर भाजपचं वर्चस्व आहे. त्यामुळे इथेही भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेला झुकतं मापं दिलं जात आहे. याठिकाणी भाजप स्वबळाची तयारी करीत आहे. उल्हासनगर शहरातही महायुतीतील संबध ताणले गेले आहेत. भाजप व शिवसेनेत रस्सीखेच आहे. अंबरनाथ शहरातील नागरी समस्यांवरून भाजपने पालिका प्रशासनाला कोंडीत पकडले आहे. येथेही पालिकेत शिवसेनेचे वर्चस्व असून अप्रत्यक्षपणे शिवसेनेलाच कोंडीत पकडण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याने भाजप विरूद्ध शिवसेना यांच्यात जुंपली आहे.बदलापूर शहरात भाजपचे आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यातील वाद तीव्र होत असल्याची चर्चा आहे.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून लढलेले वैभव पाटील यांना भाजपने प्रवेश दिल्याने नाराजी आहे. तर साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधात लढलेले सत्यजितसिंह पाटणकर यांना भाजपने पक्षात प्रवेश दिला. कित्येक वर्ष या दोन घराण्यांचा संघर्ष सुरू असताना भाजपने प्रवेश दिल्याने नाराजी आहे.
रायगडमध्ये मंत्री भरत गोगवले यांच्या विरोधात उबाठाकडून विधानसभा लढवलेल्या स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याने शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष आहे. रायगडमधील शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून बंडखोरी करत अपक्ष उभे राहिलेल्या सुधाकर घारेंना प्रवेश दिल्याने राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना हा संघर्ष शिगेला पेटला आहे.
नाशिकमध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप या तीनही पक्षात शितयुद्ध उघड आहे. भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद तर आहेच. याशिवाय भाजपकडून पालिकेत शंभरपेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले जात आहे.जळगावमधील शिवसेनेचे पाचोरा विधानसभेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे प्रतिस्पर्धी वैशाली सुर्यंवशी यांना भाजपने प्रवेश दिला. नुसता प्रवेश न देता निधीही दिला जात असल्याने किशोर आप्पांनी उघडपणे युती होणार नसल्याचे म्हटले आहे. धुळ्यात भाजपचे आमदार अमरिश पटेल यांची एकहाती सत्ता आहे. अशात शिंदेगटाची ताकद तिथे फारशी नसल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्य़ांना योग्य ती वागणूक मिळत नसल्याने नाराजीचा सूर आहे.
हिंगोलीमध्ये शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी वसमत व कळमनुरी येथे आयोजित कार्यक्रमात स्वबळाचा नारा दिला. भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे यांनीही महायुती होणार नसेल तर आम्ही स्वबळावर निवडणुका लवणार असल्याचे स्पष्ट केले होते. नांदेडमध्येही चित्र काही वेगळे नाही. शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांच्या विरोधात भाजपचे मिलिंद देशमुख रिंगणात होते. बालाजी यांचा विजय झाला, पण देशमुखांना भाजपकडून रसद पूरवली जात असल्याची सल सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात कायम आहे.
आहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेनेची फारशी ताकद नाही मात्र भाजपकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा रोष आहे. त्यामुळे जिल्ह्यात युतीसोबत जाण्याबाबत संभ्रम आहे. नंदूरबारमधील शिवसेनेच्याच आमदाराने माजी जिल्हाप्रमुख भाजपसाठी काम करत असल्याबाबतची तक्रार बैठकीत केल्याने इथेही भाजपसोबत संबध ताणले गेल्याची चर्चा आहे. स्थानिकच्या निवडणुकीच्या निमित्ताने येत्या काळात भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस पहावयास मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.