
Political News : देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक वर्षे काँग्रेसेतर पक्ष आणि नेत्यांना राजकारणात सत्तेची फारशी संधी मिळाली नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू केली आणि त्यानंतर अनेक नेते, पक्षांचा उदय झाला. उत्तर भारतातील दिग्गज समाजवादी नेते मुलायमसिंह यादव हे त्यापैकीच एक. आणीबाणी उठवल्यानंतर 1977 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात जनता पार्टीचं सरकार आलं आणि मुलायमसिंह यांना पहिल्यांदा राज्यमंत्री बनण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांची कारकीर्द बहरत गेली. समाजवादी, धर्मनिरपेक्ष मूल्यांचं राजकारण करणारा देशातील महत्वाचा नेता, अशी त्यांची ठळक ओळख निर्माण झाली.
देशात प्रादेशिक पक्षांना वेगळं महत्व प्राप्त झालं आहे. आपापल्या प्रदेशांची अस्मिता जपत या पक्षांनी अनेकवेळा राष्ट्रीय पक्षांना घाम फोडला आहे. अशा प्रादेशिक पक्षांच्या यादीत समाजवादी पक्षाचं (Samajvadi Party) नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. जनता दलाचं विभाजन झालं. त्यातून अनेक पक्षांची स्थापना झाली. समाजवादी पक्षाचा उदयही त्यातूनच झाला. मुलायमसिंह यादव यांनी 4 ऑक्टोबर 1992 रोजी समाजवादी पक्षाची स्थापना केली. या पक्षानं उत्तरप्रदेशच नव्हे तर देशाच्या राजकणारतही छाप पाडली.
उत्तरप्रदेशचे तीनवेळा मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षणमंत्री राहिलेले मुलायमसिंह यादव यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई येथे मूर्ती देवी आणि सुघरसिंह यादव या शेतकरी दांपत्याच्या पोटी झाला. या दांपत्याला पाच मुलगे आणि एक मुलगी अशी अपत्ये. रतनसिंह यादव, अभयरामसिंह यादव, शिवपालसिंह यादव, राजपालसिंह यादव हे मुलायमसिंहांचे भाऊ तर कमलादेवी या भगिनी. मुलायमसिंह यांनी पैलवान व्हावे, कुस्तीचा आखाडा गाजवावा अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती.
वडिसांच्या इच्छेनुसार मुलायमसिंह यांनी काही वर्षे कुस्तीचा आखाडा गाजवला आणि नंतर राजकीय क्षेत्राकडे मोर्चा वळवला. राजकारणात आल्यानंतर त्यांनी कुस्तीचा आखाडा कायमचा सोडला, मात्र आपल्या सैफई या गावी ते दरवर्षी कुस्त्यांच्या दंगलीचं आयोजन करायचे. कुस्ती खेळात ते निष्णात होते. त्यांनी अनेक डाव आत्मसात केले होते. कुस्तीतील डावपेच राजकीय कारकीर्दीतही त्यांच्या कामी आले.
नत्थूसिंह हे मुलायमसिंह (Mulayam singh Yadav) यांचे कुस्तीतील वस्ताद होते. ते जसवंतगरचे आमदार होते. एकदा मैनपुरी येथे कुस्तीच्या एका आखाड्यात मुलायमसिंह यांच्या खेळामुळं नत्थूसिंह प्रभावीत झाले. त्यानंतर मुलायमसिंह यांनी नत्थूसिंह यांच्या जसवंतनगर मतदारसंघातून आपल्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ केला. जसवंतनगर आणि इटावा सहकारी बँकेचे ते संचालक झाले. नत्थूसिंह यांनी मुलायमसिंहांना कुस्तीसह राजकारणातलेही डावपेच शिकवले.
जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनानं देशाला अनेक नेते दिले. मुलायसिंह यादव हेही त्या आंदोलनातूनच पुढं आलेलं नेतृत्व. आणीबाणी लागू केल्यानंतर जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली देशभरात आंदोलन करण्यात आलं. मुलायमसिंह यादव हेही या आंदोलनात सक्रिय सहभागी होते. त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना 19 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता.
उत्तर भारतातील महत्वाचे नेते, दिग्गज ओबीसी नेते, धर्मनिरपेक्ष राजकारणाची मूल्ये जपणारे नेते अशी ओळख असलेले मुलायमसिंह यादव यांनी आग्रा विद्यापीठातून राज्यशास्त्र या विषयात एमए केलं. त्यानंतर काही काळ त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं. नोकरीचा राजीनामा देऊन ते राजकारणात दाखल झाले. एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलायमसिंह यांनी 1967 मध्ये जसवंतनगर मतदारसंघातून विधानसभा गाठली होती.
राममनोहर लोहिया, राजनारायण, चंद्रशेखर, अनंतराम जयस्वाल आदी नेत्यांचा सहवास त्यांना मिळाला. 1967 ची पहिली निवडणूक त्यांनी संयुक्त समाजवादी पक्षाच्या उमेदवारीवर लढवली होती. जॉर्ज फर्नांडीस आणि अनंतराम जयस्वाल यांनी या पक्षाची स्थापना केली होती. पुढे 1977 मध्ये ते पहिल्यांद उत्तरप्रदेशचे राज्यमंत्री बनले. 1980 ते 1985 पर्यंत ते उत्तर प्रदेशातील लोकदल पक्षाचे अध्यक्ष होते. पुढे हा पक्ष फुटला आणि त्यानंतर मुलायमसिंह यांनी क्रांतिकारी मोर्चा या पक्षाची स्थापना केली.
मुलायमसिंह यादव यांचं राजकारण धर्मनिरपेक्ष मूल्यांवर आधारीत होतं. काँग्रेसचा प्रभाव कमी होत गेला आणि त्यामुळं मुलायमसिंह यांना मोठी 'स्पेस' मिळत गेली. एका साधारण शेतकरी कुटुंबातून आलेले मुलायमंसिह यादव हे पुढे शेतकऱ्यांचे नेते बनले. उत्तर प्रदेशात अन्य मागासवर्ग म्हणजे ओबीसी समाजातील लोकांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यात त्यांचे योगदान मोठं राहिलं. त्यांनी ओबीसींचं आत्मभान जागवलं. उत्तर प्रदेशात त्यांना नेताजी या टोपणनावाने ओळखलं जातं.
मुलायमसिंह हे समाजवादी नेते रामसेवक यादव यांचे शिष्य. त्यांच्यामुळेच मुलायमसिंह यांना 1967 मध्ये विधानसभेची उमेदवारी मिळाली होती आणि ते विजयी झाले होते. 1977 मध्ये रामनरेश यादव मुख्यमंत्री असताना मुलायमसिंह हे सहकार आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री बनले. जनता दलातून बाहेर पडून त्यांनी 1992 मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली. तोपर्यंत उत्तरप्रदेशात काँग्रेसची घसरण झाली होती. ती 'स्पेस' समाजवादी पक्षाने काबीज केली. समाजवादी पक्ष स्थापन केल्यानंतर मुलायमसिंह हे दोनवेळा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री बनले. त्यापूर्वी जनता दलात असताना ते 5 डिसेंबर 1989 ते 24 जानेवारी 1991 पर्यंत मुख्यमंत्री होते.
ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले ते 5 डिसेंबर 1989 रोजी. त्यानंतर 5 डिसेंबर 1993 ते 6 जून 1996 आणि 29 ऑगस्ट 2003 ते 11 मे 2007 असे तीन वेळा ते मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर 1996 मध्ये त्यांनी मैनपुरी मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी केंद्रात संयुक्त आघाडीचं म्हणजे तिसऱ्या आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. त्या सरकारमध्ये मुलायंसिंह यांना संरक्षणमंत्रिपद मिळालं. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करू शकलं नाही. त्यांचं नाव पंतप्रधानपदाच्याही शर्यतीत आलं होतं. मुलामसिंह यादव यांचे पुत्र अखिलेश यादव हेही 2012 ते 2017 पर्यंत मुख्यमंत्री होते. आता ते खासदार असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत.
समाजवादी पक्षाला 2012 च्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं. पक्षाला असं यश पहिल्यांदाच मिळालं होतं. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मायावती सरकारच्या विरोधात अखिलेश यादव यांनी रान पेटवलं होतं. उत्तर प्रदेशच्या विकासाचं व्हिजनही त्यांनी मतदारांसमोर मांडलं होतं. त्यामुळं अखिलेश यांना मुख्यमंत्रिपद मिळालं. राजकीय वर्चस्वाच्या लढाईतूनच पुढे त्यांच्यात कुटुंबात कलह निर्माण झाला होता. काका शिवपालसिंह यादव यांनी वेगळी भूमिका घेतली होती.
1990 च्या दशकात देशात मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरणाला सुरुवात झाली होती. मंडल आयोग, बाबरी मशीद-रामजन्मभूमीचा वाद यासाठी कारणीभूत ठरले होते. त्यावेळेस लालकृष्ण अडवानी, व्ही. पी. सिंह. लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव आदी नेते चर्चेत आले होते. या नेत्यांभोवतीच राजकारण फिरू लागलं होतं. रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादामुळं अडवानी आणि मुलायमसिंह यांचं महत्त्व वाढलं होतं. बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर देशाच्या राजकारणाचे स्वरूप बदलले. त्यात मुलायमसिंह यादव यांची कारकीर्द बहरत गेली.
1992 मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर देशभरात दंगली उसळल्या. उत्तरप्रदेशातही दंगली झाल्या. समाजवादी पक्षाची स्थापना 1992 मध्येच झाली होती. या दंगलींत मुलायसिंहांनी मुस्लिमांना धीर दिला. 'एमवाय' म्हणजे मुस्लिम-यादव असं समीकरण मुलायमसिंह यांनी उत्तर प्रदेशात तयार केलं. रामजन्मभूमी - बाबरी मशीद वादामुळं मुस्लिम मतदार समाजवादी पक्षाकडं वळले होते. बाबरी मशीदीचा वाद राजीव गांधी यांच्या काळात सुरू झाला होता. त्यामुळे उत्तर प्रदेशात 20 टक्के लोकसंख्या असलेले मुस्लिम काँग्रेस सोडून मुलायमसिंहाच्या छत्राखाली आले.
बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर बहुजन समाज पक्षाला सोबत घेत मुलायमसिंह यादव यांनी सरकार स्थापन केलं, ते मुख्यमंत्री बनले. सर्वाधिक 177 जागा मिळूनही भाजपला सत्तेबाहेर राहावं लागलं. मुस्लिमांचे नेते, अशी प्रतिमा मुलायमसिंह यांची तयार झाली होती. बाबरी मशीद पाडल्यानंतर काँग्रेसचा मुस्लिम आधार निसटला आणि तो समाजवादी पक्षाकडे गेला. 20 टक्के मुस्लिम आणि 8 ते 10 टक्के यादव मतदारांच्या बळावर 2012 मध्ये समाजवादी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं.
मुलायमसिंह हे एकूण दहावेळा विधानसभेत आणि सातवेळी लोकसभेत निवडून गेले होते. 1982 मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य झाले. 1967 ते 2022 अशी 55 वर्षे ते राजकारणात सक्रिय होते. 1996 मध्ये ते मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. संयुक्त आघाडीमध्ये त्यांचा पक्ष सहभागी झाला आणि एच. डी. देवेगोडा यांच्या सरकारमध्ये त्यांना संरक्षणमंत्रिपद मिळालं. पंतप्रधानपदासाठी त्यांनी लॉबिंग केली होती, मात्र त्यांच्या नावाला पाठिंबा मिळाला नाही.
अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना 2016 मध्ये काका शिवपालसिंह यादव यांच्याशी त्यांचे मतभेद झाले होते. त्यातूनच अखिलेश यांनी शिवपालसिंह यादव यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं. त्यांच्यासोबत आणखी चार मंत्र्यांना डच्चू देण्यात आला होता. यादव कुटुंबातील कलहाने गंभीण वळण घेतलं होतं. मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आल्यानंतर शिवपालसिंह यांनी मुलायमसिंह यादव यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. पक्ष फुटणार, अशी परिस्थिती निर्माण झाली.
काका-पुतण्यामधील हा दुरावा जवळपास 5 वर्षे कायम राहिला. शिवपालसिंह यांनी समाजवादी पक्षातून बाहेर पडून प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना केली होती. मुलायमसिंह यादव यांचं निधन झाल्यानंतर काका-पुतणे एकत्र आले. शिवपालसिंह यांनी आपल्या पक्षाचं विलीनीकरण समाजावादी पक्षात केलं.
मुलायमसिंह पहिल्यांदा मुख्य़मंत्री बनले त्यावेळी ध्रुवीकरणाचे जोरदार वारे वाहू लागले होते. रामजन्मभूमी- बाबरी मशीदीची वाद पेटला होता. त्यामुळे भाजपला बळ मिळू लागलं होतं. झपाट्याने आलेख उंचावत असलेल्या भाजपशी दोन हात करण्यासाठी मुलायमसिंहांनी कंबर कसली होती. ''बाबरी मस्जिद पर परिंदा भी पर नही मार सकता" असं वक्तव्य त्यांनी त्यावेळी केलं होतं. त्यामुळे मुस्लिमांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय झाले.
काही कारसेवक 2 नोव्हेंबर 1990 रोजी बाबरी मशिदीकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. सर्व प्रकारची नाकेबंदी करण्यात आली होती, मात्र कारसेवक माघार घ्यायला तयार नव्हते. त्यामुळं कारसेवकांवर आधी लाठीहल्ला करण्यात आला, त्यानंतर गोळीबार करण्यात आला. त्यात एक डझनपेक्षा अधिक कारसेवकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भाजप समर्थकांनी मुलायमसिंह यांना 'मौलाना मुलायम' असं संबोधन लावायला सुरू केलं.
मुलायमसिंह यांनी 1992 मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना तर केली, मात्र मंदिर - मशीद वादामुळे भाजप मजबूत होऊ लागली होती. अशा परिस्थितीत आपण भाजपचा एकट्याने सामना करू शकू का, अशी शंका त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यातूनच मग कांशीराम यांच्या बहुजन समाज पक्षासोबत मुलायमसिंहांनी आघाडी केली. 1993 च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला 109 आणि बहुजन समाज पक्षाला 67 जागा मिळाल्या. भाजपला 177 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी बसप आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुलायमसिंह हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले होते.
मुलायमसिंह यांच्या मूळ गावी सैफई येथे सैफई महोत्सव आयोजित केला जायचा. 1997 ते 2015 पर्यंत हा महोत्सव दरवर्षी व्हायचा. बॉलिवूडमधील बड्या कलाकारांची उपस्थिती या महोत्सवाचं आकर्षण असे. विरोधकांकडून या महोत्सवावर सातत्याने टीका केली जात असे. 2017 मध्ये हा महोत्सव रद्द करण्यात आला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, असं कारण त्यासाठी देण्यात आलं होतं, मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात सुरू असलेल्या कुरघोड्या, वादामुळं हा महोत्सव रद्द केल्याची चर्चा होती. देशातील अन्य कोणत्याही नेत्याच्या मूळ गावात अशा प्रकारचा महोत्सव होत नव्हता, आताही होत नाही. हा महोत्सव मुलायमसिंह यादव यांचं राजकीय वजन, त्यांच्या राजकीय शक्तीचं प्रतीक होतं.
10 ऑक्टोबर 2022 रोजी मुलायमसिंह यादव यांचं निधन झालं. गुरुग्राम येथील मेदांता हटॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. एका साधारण शेतकरी कुटुंबातून आलेल्या मुलायमसिंह यादव यांनी उत्तर प्रदेशासह देशाच्या राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. धर्मनिरपेक्ष मूल्यांच्या राजकारणाची चर्चा जेव्हा जेव्हा होईल, ती मुलायमसिंह यांच्या नावाशिवाय पूर्ण होणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.