
Mumbai News : राजकारण म्हटले की सर्वाना वाटते की केवळ ही सत्ता मिळवण्यासाठी लागलेली स्पर्धा आहे. राजकारणातील नेते हे कायमस्वरूपी एकमेकांचे शत्रू नसतात. निवडणुकीत एकमेकाच्या विरोधात उतरल्यानंतर प्रत्येकासाठी ती विचारांची लढाई असते, पण त्यात माणुसकी टिकवून ठेवणे ही खरी कसोटी असते.
स्वतःच्या पक्षाचे ध्येय, वेगळा विचारसरणीचा मार्ग आणि राजकीय स्पर्धा असूनही, काही नेते मैत्रीचा धागा कधीच तुटू देत नाहीत. हे नाते केवळ राजकारणापुरतं मर्यादित न राहता, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे असते. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या वणव्यातही मैत्रीचा गारवा जपणारे अनेक नेतेमंडळी आहेत. 'फ्रेंडशिप डे'च्या निमित्ताने जाणून घेऊयात राजकारणा पलिकडचे मैत्रीचे नाते जपणाऱ्या 'या' नेत्यांच्या दोस्तीची गोष्ट.
राजकारणात असूनही कायमस्वरूपी मैत्री जपणारे काही नेते आहेत. यामधील काही जण शाळेपासून एकत्र आहेत. तर काहीजण कॉलेजमध्ये एकत्र होते. तर, काहीजण राजकारणात पडल्यावर एकमेकांचे चांगले मित्र झाले. त्यामध्ये प्रामुख्याने बाळासाहेब ठाकरे-शरद पवार, विलासराव देशमुख-गोपीनाथ मुंडे, सुशीलकुमार शिंदे-विलासराव देशमुख, शरद पवार-नितीन गडकरी, अजित पवार-देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे, जयंत पाटील-उद्धव ठाकरे, आशिष शेलार-राज ठाकरे, या नेत्यांनी मैत्रीचे नाते जपले आहे.
राजकारण म्हणजे फक्त पदे मिळवणं नाही, तर विचारांच्या मर्यादेपलीकडे जाऊन माणुसकी जपणंही तितकंच महत्त्वाचे असते असा आदर्श या नेतेमंडळीने जपला आहे. विरोधी बाकांवरून एकमेकांवर टीका करणारे अनेक नेते सभागृहाबाहेर मात्र स्नेही, सल्लागार आणि जवळचे मित्र असतात. ही नाती मतांच्या आणि पक्षरेषांच्या पलिकडची असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी अनेक उदाहरणे नव्या पिढीला आजही प्रेरणा देत आहेत.
दिवंगत नेते विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांचे नाते हे केवळ राजकीय नव्हते. ते एका गावातून, एका काळात पुढे आलेले नेते होते. त्यांची मैत्री मतांवर मात करत होती. त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार (Sharad Pawar) हे दोघेही परस्पर विरोधी विचारांचे असूनही एकमेकांवर विश्वास ठेवणारे, कधी अघोषित मैत्रीत बांधले गेलेले नेते होते. तर एकाच पक्षात असताना कसलीच स्पर्धा न करता सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांची तर खरी मैत्री जिवाभावाची होती. एकाच पक्षात असल्याने या दोघांमधील नाते एका घरचे असल्यासारखेच होते.
देवेंद्र फडणवीस – एकनाथ शिंदे
भाजप (BJP)आणि शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्ष आणि एकत्रित सरकार यामागे केवळ राजकीय समीकरणं होत असे नाही तर शिंदे, फडणवीस यांचा एकमेकांवर असलेला विश्वासही होता. अनेकदा दोघांनी सार्वजनिक मंचांवर एकमेकांची प्रशंसा केली आहे, सत्तेच्या पेक्षा सहकार्य महत्त्वाचे मानले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी हे मैत्रीचे नाते जपले आहे.
नितीन गडकरी – शरद पवार
राजकीय भूमिकांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असला तरी नितीन गडकरी यांनी शरद पवार यांना नेहमीच ‘मार्गदर्शक’ म्हटले आहे. पवारांनीही गडकरींच्या कार्यपद्धतीची अनेकदा प्रशंसा केली आहे. सहकार, कृषी आणि विकास यासारख्या विषयांवर दोघांनी अनेकदा एकत्र चर्चा केली आहे. वेगवेगळ्या पक्षात असतानाही हे मैत्रीचे नाते दोघांनीही जपले आहे.
देवेंद्र फडणवीस-अजित पवार
सभागृहातल्या चढ-उतारांपेक्षा वैयक्तिक नाते अधिक महत्त्वाचे मानणारे हे नेते. अजित पवारांचे कोट्यवधींचे विनोदी टोले आणि देवेंद्र फडणवीस यांची संयमी प्रतिक्रिया यामागे परस्पर आदर आहे. सभागृहात एकत्रित काम करीत असताना त्यांनी जपले आहे. या दोघांनीही मतभेदांपेक्षा माणूसपण मोठं असतं, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.
जयंत पाटील-उद्धव ठाकरे
जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे दोघेही दादरच्या बालमोहन शाळेत एकत्र शिकले आहेत. दोघे शाळेपासूनचे मित्र आहेत. अगदी राजकारणत आल्यानंतरही त्यांची मैत्री कायम आहे. विशेषतः पूर्वी ते एकमेकांच्या विरोधात होते. मात्र, आता महाविकास आघाडीच्या निमित्ताने एकत्रित आले आहेत. वेगवेगळया पक्षात असले तरी त्यांनी मैत्री कायम जपली आहे.
उद्धव ठाकरे-संजय राऊत
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोन नेत्यांची खास दोस्ती आहे. राऊत हे शिवसेनेचे चार टर्म खासदार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची धुरा खांद्यावर घेतली. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा आहे.
राज ठाकरे-आशिष शेलार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते मंत्री आशिष शेलार यांची मैत्री सर्वश्रूत आहे. अनेक वेळा त्यांच्या वैयक्तीक गाठीभेटी होतात. नेहमीच ते एकमेकांना भेटत असतात. त्यांचे भिन्न ध्येय-धोरणे असूनही, एकमेकांच्या आयुष्यात आपुलकीने सामील होत असतात.
देवेंद्र फडणवीस - गिरीश महाजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकारणातला सर्वात जवळचा मित्र म्हणजे गिरीश महाजन हे आहेत. संकटमोचक अशी त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणातली ओळख. फडणवीस नागपूरचे, तर महाजन जळगावचे. मात्र तरीही दोघांमध्ये मैत्रीचं नाते कायम आहे.
आदित्य ठाकरे-रोहित पवार
नव्या पिढीच्या नेत्यांनी ही परंपरा पुढे चालवली आहे. युवा नेते आदित्य ठाकरे व रोहित पवार या दोघांनीही मैत्री जपली आहे. सभागृहात एकत्रित काम करताना नेहमीच दोघेही सातत्याने युवा पिढीला मार्गदर्शन करीत असतात. महाविकास आघाडीच्या माध्यमातून दोघामधील संबंध कायम मैत्रीपूर्ण राहिले आहेत.
रक्षा खडसे- प्रीतम मुंडे
एकनाथ खडसे व गोपीनाथ मुंडेंनी भाजपमध्ये अनेक वर्ष एकत्रित काम केले आहे. त्याच प्रमाणे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्यात कायमस्वरूपी मैत्रीचे नाते राहिले आहे. दोघीनींही दोन टर्म खासदार म्हणून काम केले आहे. त्यामुळे दोघीतील संबंध मैत्रीपूर्ण व जिव्हळ्याचे राहिले आहेत. रक्षा खडसेंनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी प्रितम मुंडेंची आठवण काढली. जवळची मैत्रीण प्रितम मुंडे संसदेत नसल्याबद्दल रक्षा खडसे यांना अश्रू अनावर झाले होते.
अमित देशमुख-विश्वजीत कदम
काँग्रेसमधील युवा पिढीचे नेतृत्व करीत असलेले माजी मंत्री अमित देशमुख व विश्वजीत कदम यांनी मैत्री कायम जपली आहे. दोघाही नेहमीच एकमेकांना भेटत असतात. विधिमंडळाच्या सभागृहात गेल्या दोन टर्मपासून अधिक काळ एकत्रित काम करीत असताना त्यांनी नाते जपले आहे.
ही सर्व उदाहरणं आपल्याला एक गोष्ट शिकवतात की राजकारण क्षणिक असते, पण माणूस म्हणून एकमेकांशी जोडलेलं नाते दीर्घकाळ टिकणारे असते. विरोध करावा लागतो, परंतु वैयक्तिक शत्रुत्व न ठेवता, सौहार्द जपणं हीच मोठी राजकीय परिपक्वता असते. आजच्या ध्रुवीकरणाच्या काळात अशी उदाहरणं म्हणजे एक नवा श्वास आहेत. त्यामुळे या नव्या पिढीच्या नेत्यांनी ही परंपरा पुढे चालवली, तर आपल्या राजकारणात सहिष्णुता, सुसंवाद आणि समजूतदारी अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.